

India Pakistan Ceasefire NSA Ajit Doval Chinese Foreign Minister Wang Yi
नवी दिल्ली : पाकिस्तानने शनिवारी (दि. 10) संध्याकाळी झालेल्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले. भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. दरम्यान, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डोवाल म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय लोकांचे गंभीर नुकसान झाले आहे. भारत दहशतवादविरोधी कारवाई करण्यास सक्षम आहे. दहशतवाद्यांना आम्ही ठेचून काढू. हे युद्ध भारताची निवड नाही. युद्ध हे कोणत्याही पक्षाच्या हिताचे नाही. भारत युद्धबंदीसाठी वचनबद्ध आहे. शक्य तितक्या लवकर प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्याची आम्हाला आशा आहे.’
वांग यी म्हणाले की, चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशांत आणि परस्परांशी जोडलेली आहे. आशियाई प्रदेशात शांतता आणि स्थैर्य साध्य करणे कठीण आहे आणि ते जपले पाहिजे. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी आहेत ज्यांना वेगळे करता येत नाही आणि दोघेही चीनचे शेजारी आहेत. युद्ध ही भारताची निवड नाही या तुमच्या विधानाचे चीन कौतुक करतो,’ असे म्हटले.
‘भारत-पाकिस्तान शांतता आणि संयम राखतील, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे मतभेद योग्यरित्या हाताळतील अशी अपेक्षा आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्यापासून रोखतील अशी प्रामाणिक आशा करतो. भारत आणि पाकिस्तानला सल्लामसलतीद्वारे व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदी साध्य करण्यासाठी चीन पाठिंबा देतो. हे भारत आणि पाकिस्तानच्या मूलभूत हिताचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचीही हीच इच्छा आहे,’ असेही चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी व्यक्त केले.