

Honeymoon Murder Case : देशभरातील बहुचर्चित मेघालय 'हनिमून मर्डर' प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिला सर्वोच्च न्यायालयाने दोन पर्याय दिले आहेत. सोनमवर तिचा पती राजा रघुवंशी याच्या हत्येचा कट रचल्याचा आणि त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनम हिला कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन आणि तो जामीन कायम ठेवण्याचा मेघालय उच्च न्यायालयाचा निर्णय, याविरोधात मेघालय सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायालयात हे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर हायकोर्टाने सोनम रघुवंशीला दिलेल्या जामीनाविरुद्ध मेघालय सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सुंदरेश यांनी सोनमच्या वकिलांना तिच्या वर्तनाबद्दल आणि अटकेला आव्हान देण्याच्या वेळेबाबत अनेक प्रश्न विचारले. "तुमच्या अशिलाच्या (आरोपीच्या) वर्तनाचे स्पष्टीकरण तुम्ही कसे द्याल? आरोपी आणि मृत पती दोघेही एकत्र तेथे गेले होते, हा तपासाचा पायाभूत भाग आहे. त्यामुळे आम्ही इतर मुद्द्यांवर जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, 'अटकेची कारणे मिळाली नाहीत' हा मुद्दा तुम्ही सुरुवातीलाच का उपस्थित केला नाही?"
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने तोंडी टिप्पणी करताना सांगितले, "तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एकतर आम्ही गुणवत्तेच्या आधारावर आदेश पारित करू, किंवा तुम्ही आत्मसमर्पण करावे जेणेकरून तुमची चौकशी करता येईल आणि या काळात आम्ही तुमच्या जामिनाचा विचार करू."यावर सोनमच्या वकिलांनी अशिलाकडून (आरोपीकडून) पुढील सूचना/मार्गदर्शन घेण्यासाठी वेळ मागितला आणि गुरुवारी उत्तर दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने घटनेनंतरच्या सोनमच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित केले. तसेच 'मला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती' असा युक्तिवाद आधी का केला नव्हता, यावर स्पष्टीकरण मागितले.
हायकोर्टाने अटकेच्या अर्जातील (ॲरेस्ट मेमो) टायपिंगच्या चुकीचा (क्लेरिकल एरर) आधार घेऊन सोनमला जामीन मंजूर केला होता. यावर प्रश्न उपस्थित करत खंडपीठाने विचारले की, "कलम १०३ ऐवजी कलम ४०३ लिहील्याने या टप्प्यावर खटल्यावर काय फरक पडतो?"न्यायालयाने स्पष्ट केले की, ते एकतर या प्रकरणाचा गुणवत्तेवर निर्णय घेतील किंवा प्रमुख साक्षीदारांची साक्ष नोंदवेपर्यंत सोनमला आत्मसमर्पण करण्याचे आदेश देतील.
मेघालय सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, या प्रकरणी पोलीस इतर सह-आरोपींना अटक करेपर्यंत सोनम फरार होती. त्यानंतरच तिने आत्मसमर्पण केले.ॲरेस्ट मेमोमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (हत्या) ऐवजी कलम ४०३ लिहीले जाणे ही केवळ टायपिंगची चूक होती. याचा अर्थ 'अटकेची कारणे दिली नाहीत' असा होत नाही. सोनमला तिच्या अटकेची कारणे पूर्णपणे माहीत होती.सोनमने दंडाधिकारी (Magistrate) किंवा तिच्या आधीच्या जामीन अर्जांमध्ये अटकेची कारणे न मिळाल्याचा आक्षेप घेतला नव्हता. तिसऱ्या जामीन अर्जाच्या वेळी कोणीतरी सल्ला दिल्यानंतर तिने हा मुद्दा अचानक समोर आणला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या टप्प्यावर ते सरकारी पक्षाच्या आरोपांची सविस्तर तपासणी करणार नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.
मेघालय हायकोर्टाने सोनमचा जामीन कायम ठेवताना म्हटले होते की, अटकेच्या कागदपत्रांमध्ये वारंवार अस्तित्वात नसलेल्या 'कलम ४०३(१)' चा उल्लेख करणे हे पोलिसांचा निष्काळजीपणा दर्शवते. एकापाठोपाठ एक मुख्य कागदपत्रांमध्ये हीच चूक होणे हे टायपिंगची चूक मानून दुर्लक्षित करता येणार नाही.
१२ मे २०२५ रोजी सोनम आणि राजा रघुवंशी यांचा विवाह झाला होता. २३ मे रोजी मेघालयात हनिमूनसाठी गेलेले असताना नवविवाहित दाम्पत्य बेपत्ता झाले. २ जून रोजी (बेपत्ता झाल्यानंतर सुमारे १० दिवसांनी) पूर्व खासी हिल्स येथील 'वैसावडॉन्ग धबधब्या'जवळील खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. ८ जूनपर्यंत बेपत्ता असलेली सोनम वाराणसी-गाझीपूर महामार्गावरील एका ढाब्याजवळ सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम आणि तिचा २१ वर्षीय प्रियकर राज कुशवाह यांनी कट रचून राजा रघुवंशीचा खून केला. या हत्येतील मुख्य संशयित आहेत. पोलिसांनी या प्रकरणात ७०० हून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, हा खून पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले आहे.