Lok Sabha Election 2024 : या ‘चिल्लर पार्टीं’मुळे PM मोदींची वाढली डोकेदुखी : संख्याबळ कमी पण मागण्या जास्त!

loksabha election 2024
loksabha election 2024

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी आज (दि. 7 जून ) रोजी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार स्थापनेत व्यस्त असतानाच त्यांच्या मित्रपक्षांची मागणी यादीही बाहेर येऊ लागली आहे. सरकार स्थापनेचे दोन्ही महत्त्वाचे घटक म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या स्वतःच्या अटी आहेत आणि इतर घटक पक्षांच्याही स्वतःच्या मागण्या आहेत. Lok Sabha Election 2024

NDA मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा आहेत?

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने एकुण २९३ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजप २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर तेलगू देसम पार्टी (टीडीपी) १६ जागांसह एनडीएमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) १२ जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे. युतीतील चौथा सर्वात मोठा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ज्याने सात जागा जिंकल्या आहेत. ५ खासदार असलेला चिराग यांचा पक्ष NDA मधील पाचवा सर्वात मोठा पक्ष आहे.

एनडीएचे १० पक्ष आहेत ज्यांच्याकडे संख्याबळाच्या नावावर फक्त एक किंवा दोन खासदार आहेत. राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) दोन खासदार आहेत ज्यांचा पश्चिम उत्तर प्रदेशच्या राजकारणात चांगला प्रभाव आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा पक्ष जनता दल (धर्मनिरपेक्ष) म्हणजेच जेडीएस आणि पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाकडे (जेएसपी) फक्त दोन खासदार आहेत. तर अनुप्रिया पटेल यांच्या नेतृत्वाखालील अपना दल (सोनेलाल), जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष), अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), प्रेमसिंग तमांग गोळे यांचा सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (एसकेएम), आसाम गण परिषद, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन. AJSU) UPPL यांचे प्रत्येकी फक्त एक खासदार आहे. Lok Sabha Election 2024

काय आहेत मागण्या?

चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी, लोकसभेच्या अध्यक्षांसह सरकारमधील महत्त्वाच्या मंत्रिपदांवर दावा मांडला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेडने (जेडीयू) देखील यूसीसीवर चर्चा आणि अग्निवीर योजनेवर पुनर्विचार करण्याची अट ठेवली आहे. शून्य जागा असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनीही मंत्रिपदाची मागणी केली आहे. मंत्रिमंडळासाठी जेडीयूने चार खासदारांसाठी एक मंत्रिपदाचा फॉर्म्युला दिला आहे, तर पाचसाठी एक मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही चर्चेत आहे.

लोकसभेत शून्य संख्याबळ असलेल्या रामदास आठवले यांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात मोठ्या पदाची आशा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए सरकारमध्ये एक किंवा दोन जागा असलेल्या पक्षांच्या नेत्यांना जुळवून घेणे पंतप्रधान मोदींसाठी डोकेदुखी ठरू शकते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news