PM Modi @ ISRO | चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या जागेचे नाव आता ‘शिवशक्ती’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

PM Modi @ ISRO | चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या जागेचे नाव आता 'शिवशक्ती' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM Modi @ ISRO : चांद्रयान-३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले, ती जागा आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथील इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये बोलताना केली. “२३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर ध्वज फडकावला. आतापासून हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून ओळखला जाईल”, अशी घोषणाही पीएम मोदी यांनी केली.

ग्रीस दौऱ्यावरुन परतल्यानंतर पीएम मोदी यांनी आज इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन केले. यावेळी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी पीएम मोदी यांना चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेविषयी माहिती दिली. त्यानंतर पीएम मोदी यांनी इस्त्रोच्या शास्ज्ञज्ञांना संबोधित केले. यावेळी ते भावूक झाले होते.

आज तुम्हा सर्वांमध्ये असल्याने मला एक वेगळाच आनंद वाटत आहे. कदाचित असा आनंद फार क्वचित प्रसंगी घडतो. मला भारतात येताच तुम्हाला भेटायचे होते. तुम्हा सर्वांना सलाम करावासा वाटला. तुमच्या मेहनतीला सलाम, सलाम तुमच्या संयमाला, सलाम तुमच्या जिद्दीला, सलाम तुमच्या आत्म्याला. तुम्ही देशाला ज्या उंचीवर नेले आहे ते सामान्य यश नाही. हे अनंत अवकाशातील भारताच्या वैज्ञानिक क्षमतेचे शंखानाद आहे. जिथे कोणी गेले नव्हते तिथे आम्ही गेलो. आम्ही ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. हा आजचा भारत आहे तो धाडसी आणि नवा विचार करणारा, नव्या पद्धतीने विचार करणारा आहे. २३ ऑगस्टचा तो दिवस प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर फिरत आहे. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण म्हणजे २३ ऑगस्टचा. तो दिवस अजरामर झाला, असे पीएम मोदी म्हणाले.

२३ ऑगस्टचा दिवस प्रत्येक भारतीयाला विजय आपलाच वाटत होता. प्रत्येक भारतीयाला असे वाटले की जणू तो स्वत: मोठी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आजही आपले सर्वांचे अभिनंदन केले जात आहेत, संदेश दिले जात आहेत आणि हे सर्व माझ्या देशाच्या वैज्ञानिकांमुळे शक्य झाले आहे. तुमची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. आज संपूर्ण जगाने भारताची वैज्ञानिक भावना, आपले तंत्रज्ञान आणि आपला वैज्ञानिक स्वभाव स्वीकारला आहे.

 चांद्रयान महाअभियान हे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण मानवतेचे यश आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपले चांद्रयान उतरले आहे त्या भागाचे नाव भारताने ठरवले आहे. चांद्रयान-3 चा चंद्र लँडर ज्या ठिकाणी उतरला, ते ठिकाण आता ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखला जाईल. चंद्रावरील ज्या बिंदूवर चांद्रयान-३ ने आपल्या पावलांचे ठसे सोडले आहेत त्याला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल. हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते, असे पीएम मोदी यांनी म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button