Manipur Women Assault : ‘त्या’ फेक व्हिडिओमुळे ‘बदला’ घेण्यासाठी महिलांवर लैंगिक अत्याचारांचे सत्र
पुढारी ऑनलाईन डेस्क : Manipur Women Assault : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड आणि त्यांच्यावरील सामूहिक बलात्कारांच्या घटनने सारा देश सुन्न झालेला आहे. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १५० लोकांनी जीव गमावला आहे, या हिंसाचारात महिलांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आता पुढे येत आहे. या सगळ्या हिंसाचाराला एक फेक व्हिडिओमुळे निमित्त मिळाल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसते.
मणिपूरमधील दंगलीत महिलांवर मोठ्या प्रमाणवर अत्याचार होत असल्याचे वृत्त द प्रिंट या वेबसाईटने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केले होते.
एक तरुणीचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगेत गुंडाळल्याचा एक फोटो आणि व्हिडिओ मे महिन्याच्या सुरुवातीला व्हायरल झाला होता. ही महिला मैती समुदायातील असून कुकी समुदायातील पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केले अशी माहिती पसरवण्यात आली. (Manipur Women Assault)
पण हा व्हिडिओ, फोटो हे दुसऱ्याच घटनेतील होते. नोव्हेंबर २०२२मध्ये दिल्लीत आयुषी गुप्ता या तरुणीचा तिच्याचा पालकांनी खून केला होता. हा फोटो मैती तरुणीचा म्हणून व्हायरल करण्यात आला. पोलिसांनी यासंदर्भातील खुलासा करेपर्यंत मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळण्यास सुरुवात झाली होती. (Manipur Women Assault)
कुकी आणि मैती यांच्यात झालेल्या दंगलीत महिलांवर अत्याचार झाले, पण त्यावर फारसं बोललं गेले नाही, असे या लेखात म्हटले आहे.
४ मे रोजी ४० वर्षांची एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीला भात शेतांत फरफटत नेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.
आमच्या महिलांवर तुमच्या समुदायातील पुरुषांनी जे अत्याचार केले, तेच आम्ही तुमच्यासोबत करू, असे हा जमाव सांगत होता.
“खोट्या माहितीवरून आमच्यावर अत्याचार झाले. बदला घेण्यासाठी आमच्यावर बलात्कार झाले,” असे एका पीडितीने सांगितले. चुराचांदपूर येथे रिलिफ कँप उभारण्यात आले आहे, तिथे या महिलने आसरा घेतला आहे.
या महिलेने पोलिसांत तक्रार दिलेली नाही. या वृत्तात द प्रिंटने बलात्काराच्या किमान सहा घटनांतील पीडितांशी संपर्क साधल्याचे म्हटले आहे.
महिलांच्या शरीराचा वापर बदल्यासाठी
जगभरात दंगली आणि हिंसाचारात बलात्कार, लैंगिक अत्याचार यांचा वापर शस्त्रांसारखा केला जातो, असे Genocide Convention international treatyने ही मान्य केलेले आहे.
२००२च्या गुजरात दंगली आणि २०२०च्या दिल्ली दंगलीतील महिलांवर अत्याचारांच्या तक्रारी संदर्भात काम करणारे वकील सुरुर मंदर म्हणातात, “महिलांचं शरीर समाजासाठी सन्मानाचे प्रतीक असते. दंगलीत, हिंसाचारात विरोधी समुदाय महिलांवर अत्याचार करून त्या समुदायाला अपमानित करण्याचा प्रयत्न करत असतो.”
आणखी वाचा :
- Manipur Women Assaulted : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर ४० जणांकडून लैंगिक अत्याचार; महिला आयोगाकडील अन्य ३ तक्रारीतील माहिती उघड
- Manipur Assault: विरोधकांची लोकसभेत राडेबाजी; मणिपूर विषयावर चर्चा करण्यास सरकार तयार – संरक्षण मंत्री राजनाथ सिंग
- Manipur violence : मणिपूर महिला अत्याचार प्रकरणी संजय राऊतांची सरकारवर कठोर टीका म्हणाले, मगरीचे अश्रू…