मणिपूरमधील हिंसाचारातील मृतांची संख्‍या ५४ वर, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर | पुढारी

मणिपूरमधील हिंसाचारातील मृतांची संख्‍या ५४ वर, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमधील हिंसाचाराचा ( Manipur Violence ) वणवा आता आटोक्‍यात येत आहे. राज्‍यात भारतीय सैन्‍यदलासह आसाम रायफल्‍स आणि रॅपिड ॲक्‍शन फोर्स तैनता केल्‍यानंतर परिस्‍थिती नियंत्रणात आली आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्‍यान, हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये राज्‍यात ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बुधवारी चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात मणिपूरमधील बहुसंख्य मेईतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीला विरोध करण्यासाठी. हिंसाचार उसळला. मागील तीन दिवस राज्‍यातील विविध भागात हिंसाचाराचा भडका उडत होता. इम्फाळ खोऱ्यात आज (दि.६) बाजारपेठा आणि दुकाने सुरू झाली. रस्त्यांवर काही वाहने दिसू लागली आहेत. राज्यात आतापर्यंत दहा हजारांहून अधिक सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. या कडेकोट बंदोबस्तामुळे इंफाळमध्ये लोक रस्त्यावर दिसू लागले आहेत.

हिंसाचारात पाच दहशतवादी ठार झाल्‍याचे राज्‍य सरकारने म्हटले आहे. चुरचंदपूर येथे झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत राखीव बटालियनचे दोन जवान जखमी झाले. रचंदपूरमधील सायटन येथे झालेल्‍या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. टोरबुंग परिसरात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा सूत्रांनी सांगितले.

Manipur Violence : दोन समुदायांमधील हिंसाचार दुर्दैवी : रिजिजू

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती पावले उचलत असल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज ( दि. ६ ) सांगितले. केंद्रीय गृहमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आवश्यक ती पावले उचलत आहेत. दोन समुदायांमधील हिंसाचार ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मेतेई असो वा कुकी, दोघेही एकाच राज्यातील आहेत आणि एकत्र राहण्याची गरज आहे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

हेही वाचा :

 

 

Back to top button