सोलापूर : समांतर जलवाहिनीचे काम वेळत पूर्ण करावे, सार्वजनिक नळ बंद कारवाई थांबवावी -प्रणिती शिंदे | पुढारी

सोलापूर : समांतर जलवाहिनीचे काम वेळत पूर्ण करावे, सार्वजनिक नळ बंद कारवाई थांबवावी -प्रणिती शिंदे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: समांतर जलवाहिनीचे थांबवलेले काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी टाईम प्रोग्राम आखावा व ते पूर्ण करून घ्यावे. तसेच सार्वजनिक नळ बंद करण्याची कारवाई तातडीने थांबवावी; अशा सूचना आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या. सोलापूर येथील नियोजन भवनात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीची बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

पुढे आमदार शिंदे म्हणाल्या, सोलापूर शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी समांतर जाहीर वाहिनीची योजना कागदी घोडे चालवून विनाकारण प्रलंबित ठेवण्यात येत आहे. यामुळे शहरासाठी प्रामुख्याने महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प मागे पडत गेलेला आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून फक्त टेंडर प्रक्रिया व इतर गोष्टीची कारणे सांगून या प्रकल्पाचे काम थांबवलेले आहे. अशामुळे उजनी धरणामध्ये मुबलक पाणी असूनदेखील सोलापूरकरांना 5 ते 6 दिवसा आड पाणी मिळत आहे.

काही काळापूर्वी चालू झालेले काम कोणतेही वैद्य कारण नसताना, ‘स्मार्ट सिटी’च्या तत्कालीन सीइओंनी थांबवले होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करा व हे काम पूर्ण होण्याकरिता कालमर्यादा निश्चित करून, तसा कार्यक्रम आखण्यात यावा; असे आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.

समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी देता येईल. यामुळे या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, या प्रकल्पावर काम करत असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करावा; अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

सामूहिक नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा

तसेच शहरातील सार्वजनिक नळ महानगरपालिकेकडून बंद करण्यात येत आहेत. ही कारवाई थांबून प्रथमतः सामूहिक नळ कनेक्शन घेण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती करावी. घंटा गाड्यांवरील स्पीकरचा वापर करून झोपडपट्टी भागांमध्ये चांगल्यारीतीने जनजागृती करता येईल, अशाही त्या म्हणाल्या. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता, थेट सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करणे म्हणजे गोरगरीब लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणे असे आहे. त्यामुळे प्रथमतः नागरिकांमध्ये जनजागृती करावी, त्यांना सामूहिक नळ कनेक्शन देऊन पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर सार्वजनिक नळ कनेक्शन बंद करावे; अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

हेही वाचा:

Back to top button