देशातील सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक; रॉ,आयबीसह ११ राज्यातील एटीएस प्रमुखांची हजेरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक : तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीसंबंधी शुक्रवारी राजधानी दिल्लीत देशातील सर्वच सुरक्षा यंत्रणा तसेच राज्यातील दहशतवादी विरोधी पथकाच्या एटीएस प्रमुखांची बैठक पार पडली.

दिल्ली पोलीस मुख्यालयात आयोजित या बैठकीत देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेसंबंधी विस्तृत आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बैठकीत ११ राज्यातील एटीएस प्रमुख,स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) तसेच गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

गुप्तचर यंत्रणांसोबत एटीएसचा समन्वय वृद्धींगत करणे तसेच येत्या काळात मिळालेले गुप्त इनपुट लवकरात लवकर शेअर करण्यासंबंधी बैठकीत जोर देण्यात आल्याचे कळते. विविध राज्यातील पोलीस दलासोबत समन्वयाच्या अनुषंगाने अशाप्रकारची बैठक यापूर्वीच पार पडली आहे. पंरतु, नुकत्याच हाती लागलेल्या दहशतवाद्यांकडून समोर आलेल्या 'दहशतवादी मॉड्युल' नंतर 'टेरर अलर्टस'संबंधी ही बैठक घेण्यात आल्याचे कळतेय.

सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक

सुरक्षा यंत्रणेच्या बैठकीत दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांच्या सह सर्व विशेष आयुक्त, विशेष पथकाचे पोलीस आयुक्त, इंटेलिजेंस, विजिलेंस, कायदा-सुव्यवस्था, गुप्तचर एजेन्सी रॉ,आयबी, एनआयए तसेच फील्ड ऑपरेशनशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालिबानने अफगानिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर वेगाने बदलेल्या वातावरणावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या घटनेनंतर देशातील दहशतवादी कारवायांमध्ये कशाप्रकारचा बदल होऊ शकतो, या अनुषंगाने देखील मंथन करण्यात आल्याचे कळतेय.

कुठलीही अप्रिय घटना घडू नये याकरिता अगोदरपासूनच तयारीकरीता उत्तम समन्वय राखण्यासाठी बैठकीचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी सीमावर्ती भागात घुसखोरीची माहिती मिळाली होती.

तत्काळ सुरक्षा यंत्रणांकडून देशात दहशतवादी मोठी घातपाताची कारवाई घडूवन आणू शकतात यासंबंधीचा अलर्ट देण्यात आला होता. यानंतर संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आला होता. दिल्ली पोलीस मुख्यालयात पहिल्यांदाच अशाप्रकारे आयबी, रॉ आणि गुप्तचर एजेन्सींच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

१५ ऑगस्टला तालिबानने काबुलवर कब्जा केला होता. यानंतर भारताविरोधात अफगानिस्तानच्या जमिनीची दहशतवादी वापर करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशात सर्वच गुप्तचर यंत्रणा अलर्टवर आहेत. याअनुषंगाने या बैठकीतून तयार होणाऱ्या समन्वयाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="39086"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news