पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमध्ये ६५००० कोटींची गुंतवणूक करत ४०,००० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी यांनी काँग्रेस नेते अशोक गहलोत यांना दिला आहे. गौतम अदाणी शुक्रवारी (दि.७) इनव्हेस्ट राजस्थान २०२२ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये सामाजिक सुरक्षेबाबत राबवण्यात येणाऱ्या योजनांचे कौतुकही केले. मुख्यमंत्री अशोक गहलोत जलत गतीने चांगले निर्णय घेतात, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
गौतम अदाणी यांनी गहलोत यांच्या जुन्या सरकारबाबतचा किस्साही यावेळी बोलताना सांगितला. ते म्हणाले की, मी जेव्हा अशोक गहलोत यांना भेटलो, तेव्हा त्यांच्याकडे राजस्थानच्या विद्युत क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशोक गहलोत यांनी ही गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आणि प्रशासनास याबाबतचे आदेशही दिले होते.
गौतम अदाणी यांनी राजस्थान सरकारच्या जागृती बँक टू वर्क योजना आणि शक्ती उडान योजनेचे कौतुक केले. या योजनांमुळे सामाजिक सुधारांबरोबरच राजस्थानचा आर्थिक विकासही होत आहे, असेही अदाणी यावेळी बोलताना म्हणाले.
गौतम अदाणी म्हणाले, की त्यांचा उद्योग समुह राजस्थानच्या विद्युत क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. अदाणी समुहाने राजस्थानमध्ये यापूर्वीच ३०,००० कोटींची गुतवणूक केली आहे. तर आगामी ५ ते ७ वर्षांत विद्युत क्षेत्रात ५०,००० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.