प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी दुप्पट, वर्षाला ६ ऐवजी १२ हजार मिळणार | पुढारी

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी दुप्पट, वर्षाला ६ ऐवजी १२ हजार मिळणार

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : देशातील शेतकर्‍यांसाठी लवकरच एक आनंदाची मिळणार असून, काही दिवसांत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी आता दुप्पट होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच तसा निर्णय घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना 6 हजारऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्रप्रताप सिंह यांनी नुकतीच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना निधी दुप्पट करणार असल्याची चर्चा झाल्याचे समजते.

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी तयारी पुर्ण

या भेटीतील चर्चेच्या हवाल्यानुसार अमरेंद्रप्रताप सिंह यांनी सरकार पीएम किसान सन्मान योजनेची रक्कम दुप्पट करणार असल्याचा दावा केला आहे. त्या संबंधित सर्व तयारी सरकारने केली आहे. तथापि, केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या योजनेंतर्गत गेल्या सोमवारी देशातील शेतकर्‍यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. बळीराजाचे जीवन सुसह्य आणि सुखाचे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मोदी यांनी रविवारी म्हटले होते.

मोदी यांच्या या विधानावरूनच या योजनेचा निधी वाढवण्यात येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या योजनेनुसार देशातील शेतकर्‍यांच्या खात्यात नववा हप्ता जमा करण्यात आला आहे.

पहिला हप्त्यात 3,16,06,630 शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार जमा करण्यात आले आहेत. तर नवव्या हप्त्यात आतापर्यंत 9,90,95,145 शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे.

आता येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात नवव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट व्हावे, असा या योजनेचा उद्देश असून, या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2018 मध्ये केली आहे.

Back to top button