नवीकरणीय उर्जेमुळे विजेचे दर कमी होणार : केंद्रीय उर्जा मंत्री | पुढारी

नवीकरणीय उर्जेमुळे विजेचे दर कमी होणार : केंद्रीय उर्जा मंत्री

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : देशातील एकूण उर्जा निर्मितीच्या सर्व प्रकारांमध्ये सध्या कोळसा आधरित औष्णिक उर्जा निर्मितीचा वाटा तब्बल ५२% आहे. पंरतु, २०३० पर्यंत हा वाटा ३२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची योजना केंद्रीय उर्जा मंत्रालयाने तयार केली आहे, अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी राज्यसभेत एका लिखित उत्तराद्वारे दिली आहे. नवीकरणीय उर्जेमुळे ग्राहकांच्या विजेचे दर कमी होतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

ग्राहकांसाठीचे किरकोळ वीजदर संबंधित राज्य नियामकांकडून निश्चित होत असतात. विद्युत निर्मिती क्षेत्रात आता नवीकरणीय उर्जेचा समावेश झाला असल्याने या विजेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आहेत. सौर उर्जेचा सध्याचा किमान दर १ रुपया ९९ पैसे आहे आणि हा दर कोळशावर आधारित अनेक प्रकल्पांतून मिळणाऱ्या विजेच्या दराहून कमी आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

सरकारने अक्षयऊर्जेचे औष्णिक आणि जलविद्युत प्रकल्पांशी एकत्रीकरण करणारी योजना सुरु केली आहे. त्यामुळे देखील ग्राहकांसाठी विजेचे दर कमी होण्यास मदत होत आहेत. तसेच हरित उर्जा कॉरिडॉर उभारण्यासाठी आणि कृषीक्षेत्रासाठीचे फीडर आणि पंप यांच्या सौरीकरणासाठी कुसुम योजनेअंतर्गत सरकार मदत अनुदान देखील दिले जात असल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलं का? 

 

 

Back to top button