

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार होत आहे. नितेश राणेंनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मनपाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि परत पालिकेतील सत्ताधारी आदित्यसेनेने मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार, अशा उलट्या बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित केली आहे.
पत्र जसं आहे तसं
मनपाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत आणि परत सत्ताधारी आदित्यसेनेनं मुंबई महाष्ट्रापासून तोडणार व मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणार अशा उलट्या बोंबा मारणं सुरू केले आहे. परंतु वास्तविक यांच्या जवळच्याच असलेल्या टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकांमुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झाला आहे. पुर्नविकास नियंत्रण नियमावली अंतर्गत भाडेकरू तथा एस.आर.ए. मधील झोपडपट्टी धारक खासगी विकासकांची नेमणूक करतात. या पद्धतीच्या अनेक पुर्नविकास प्रकल्पांमध्ये विकासक एक ते दीड वर्षाचे पर्यायी जागेचे भाडे देणे कबूल करतात. परंतु अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये अनेक विकासकांची कामे रखडल्याने त्यांनी भाडेही देणे बंद केले आहे.
एका बाजूला कोडमुळे मराठी बांधवांची रोजीरोटी गेली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील मराठी माणसाला आपल्या आयुष्यातील सहा सहा तास वसई विरारच्या प्रवासात घालवावे लागतात. राहत आहेत ते मूळ घर विकासकाने अडवून ठेवलंय आणि भाडे मिळण्याअभावी घरातून हकालपट्टी होत आहे. काही ठिकाणी तर इमारत तयार असूनही ना इमारत ताब्यात मिळतेय ना हक्काचे भाडे मिळतेय. त्यामुळे नाईलाजास्तव मराठी कुटुंब आपले हक्काचे घर विकासकला किंवा एजंटला स्वस्त दरात विकण्यास बाध्य होतात.अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने ठोस पाऊल उचलून जनतेला वेठीस धरणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण लक्ष घालून सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती. असं विनंतीवजा पत्र नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे.