खा. तुमाने यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारावे : अनिल देशमुख
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रामटेकचे शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. आता त्यांनी अजित पवार यांचे आव्हान स्वीकारावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राज्यात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विदर्भातील अकोल्यापासून सुरू झालेले दंगलीचे लोण आता थेट कोल्हापूरपर्यंत पोहोचले आहेत. कधी-कधी तर सरकारलाच दंगली घडवायच्या आहेत की काय असे वाटते, अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आज नागपुरातील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला.
यावेळी देशमुख म्हणाले, समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे प्रयत्न सतत सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. निवडणुकीपूर्वी दंगली घडवून आणायच्या, लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याचा फायदा घ्यायचा, असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. आता सावध राहून जनतेने असे प्रयत्न हाणून पाडावे. सत्ताधाऱ्यांच्या या डावाला बळी पडू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान, नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केलेल्या विभागीय अध्यक्ष नियुक्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी विरोध केला आहे. या नियुक्त्यांवर फेरविचाराची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत विचारले असता, पक्षात कुठलेही मतभेद नाहीत. नियुक्त्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. चर्चेतून तोडगा काढता येईल, असे देशमुख म्हणाले. राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सभ्य, सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते असल्याने शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत एकेरी उल्लेख करणे त्यांना शोभले नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- Kolhapur Bandh : कोल्हापुरात तणावाचे वातावरण; पालकमंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा
- Sharad Pawar : लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता नाही: शरद पवार
- Kolhapur bandh : कोल्हापूरमधील अशांततेला कोण जबाबदार? अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल