

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभेच्या निकालामुळे राज्यातील सत्ताधारी विधानसभेच्या भानगडीत पडतील, असे वाटत नाही. ते लोकसभेची तयारी करतील, राज्यातील सरकारही लोकसभेवर लक्ष केंद्रित करेल, असे सांगत देशातील विविध राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधी ट्रेन्ड दिसून आला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (दि. ७) पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पवार (Sharad Pawar) म्हणाले की, देशाचा नकाशा समोर ठेवला तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार नाही. राज्याच्या निवडणुकांमध्ये लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली आहे. हाच ट्रेन्ड जर लोकसभेला राहिला, तर वेगळे चित्र बघायला मिळेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज पडणार नाही, देशातील सामान्य माणूस सुज्ञ असल्याने बदल होईल.
महाविकास आघाडी आणि आगामी निवडणुका याबद्दल शरद पवार म्हटले की, महाविकास आघाडी सक्षम आहे, तिन्ही पक्षाने एकत्रित बैठक घेऊन जागा वाटपाची चर्चा करावी. या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य सहभागी होऊन जागा वाटपाची चर्चा करतील, असे पवार यांनी सांगितले. प्रत्येक जण जादा जागांची मागणी करत आहेत. शेवटी वाटाघाटीतून जागा कमी जास्त होतात, पण ज्यांची निवडून आणण्याची क्षमता आहे, त्यांना प्राधान्य द्यावे, ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, असेही पवार यांनी सांगितले.
जर शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर केली, तर आत्महत्या थांबू शकतात, त्यामुळे रब्बी आणि खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपये द्यावेत, अशी शिफारस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे सरकारकडे करणार आहेत, या संदर्भात त्यांनी सर्व्हे केला आहे, असा प्रस्ताव जर विभागीय आयुक्त सरकारकडे करणार असतील, तर त्यास गंभीरतेने घ्यावे लागेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
मोबाईलवर काही तरी मॅसेज पाठवला जातो. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरत आहेत. त्याला धार्मिक स्वरुप देणे बरोबर नाही, सत्ताधारी पक्ष या अशा सगळ्या गोष्टींना प्रोत्साहित करतो, राज्य सरकारची जबाबदारी राज्यात शांतता प्रस्तापित करणे ही आहे. मात्र, या प्रकारामध्ये राज्य सरकार व त्यांचे सहकारीच उतरायला लागले. तर त्यातून कटूता निर्माण होत असेल, तर ही चांगली गोष्ट नाही. हे घडवलं जातेय, असेही पवार यांनी सांगितले.
हेही वाचा