चंद्रपूर : बारावीच्या परीक्षा केंद्रावर मधमाशांचा हल्ला; चार जखमी; राजुरा तालुक्यातील घटना | पुढारी

चंद्रपूर : बारावीच्या परीक्षा केंद्रावर मधमाशांचा हल्ला; चार जखमी; राजुरा तालुक्यातील घटना

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या पेपरसाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यात तीन विद्यार्थ्यी व एक शिक्षक जखमी झालेत. राजुरा तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा येथे आज (दि.१) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. सुरज भिमनकर, तेजस मुके, दीपक उमरे, मोरेश्वर लांडे (शिक्षक) अशी जखमींची नावे आहेत.

आज बारावीचा रसायनशास्त्र व व्होकेशनल विषयाचा पेपर होता. पेलोरा येथील परीक्षा केंद्रावर एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेसाठी होते. पेपरच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावरील खोल्यांमध्ये जात असताना प्रवेशद्वारा जवळच मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाशांनी चावा घेतल्यामुळे तीन विद्यार्थ्यांसह शिक्षक जखमी झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. यानंतर पेपरला नियमित वेळात सुरुवात झाली. या घटनेमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा :

Back to top button