बुलढाणा : तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; करवंड येथील घटना
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : गावतलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना करवंड (ता. चिखली) येथे घडली. आदीत्य नारायण जाधव (वय११) व अनिकेत गजानन जाधव (वय १०, रा.करवंड) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
या घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारचे सायंकाळी करवंड येथील शेतकरी म्हशींना पाणी पाजण्यासाठी गावतलावावर घेऊन गेला होता. तेव्हा त्याला तलावाच्या काठावर दोन मुलांचे कपडे व चपल्या दिसून आल्या. पण तलावाच्या आसपास मुले दिसून आली नसल्याने त्याने याबाबत गावातील ग्रामस्थांना सांगीतले. ग्रामस्थांनी तात्काळ तलावाकडे धाव घेतली व पाण्यात शोध घेतला असता पाण्याखालील गाळात दोन मुलांचे मृतदेह आढळले. आदीत्य व अनिकेत यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी हंबरडा फोडला. आदीत्य हा पाचवीच्या वर्गात तर अनिकेत हा चौथीच्या वर्गात शिकतो. ते दोघे मित्र कुणालाही न सांगता तलावावर पोहायला गेले होते. यातील आदीत्य याला पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने गाळात फसून दोघांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे करवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
- नगर : पोलिस अधिकार्याकडून महिलेस मारहाण ; टोलनाक्यावरील घटना
- यवतमाळ : भरधाव कारची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार
- प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलाचा हात तोडून खून?