यवतमाळ : डोळ्यांत मिरचीपूड टाकून शेतकऱ्याचे तीन लाख पळविले
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा ; कापूस विक्रीची रक्कम घेऊन दुचाकीने घरी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोघा चाेरट्यांनी ३ लाख २० हजार रुपयांची राेकड हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि.२४) रोजी रात्री उमरखेड तालुक्यातील निंगनूर ते मेट दरम्यानच्या घाटात घडली. गणेश राठोड असे शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गणेश राठोड हे मेट येथील रहिवासी आहेत. गुरुवारी ते फुलसावंगी येथे शोततील कापूस विक्रीसाठी गेले हाेते. कापूस विकल्यानंतर ३ लाख २० हजार रुपयांची रक्कम घेवून ते सहकाऱ्यासोबत आपल्या दुचाकीने निंगनूर मार्गे मेटकडे येत होते.घाटामध्ये त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोघे अज्ञात आले. राठोड यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. त्यामुळे राठोड व त्यांचा मित्र दुचाकीवरून खाली पडले.
काही समजण्याचा आतच अज्ञातांनी पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. राठोड यांनी आपल्या जवळची बॅग सोडली नाही. यावेळी अज्ञात आणि राठोडसह त्यांच्या मित्रामध्ये झटापट झाली. यानंतर चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावून चाेरट्यांनी पोबारा केला.
राठोड यांनी मोबाईल फाेनवरुन ग्रामस्थ आणि पोलीस पाटील उत्तम मुडे यांना या घटनेची माहिती दिली. बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस घटनास्थळी दाखल झाले. बिटरगाव पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचलंत का?