

टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसूली विभागाने थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेत टिटवाळ्यातील जी.आर. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजवर कठोर कारवाई करत शाळेचे तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले. तब्बल 1 कोटी 28 लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकवल्याने ही कारवाई करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या कर वसूली पथकाने अचानक शाळेत दाखल होत कारवाई केली. शाळा व्यवस्थापनाने विश्वस्तांचे कार्यालय सील करण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती; मात्र ती नाकारत प्रशासनाने थेट शाळेचे आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले. या कार्यालयांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्रे असल्याने शैक्षणिक कामकाज ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शाळेत विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू असताना ही कारवाई करण्यात आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षा कालावधीत कारवाई टाळायला हवी होती, अशी भावना संबंधितांकडून व्यक्त होत असताना, वेळेत कर थकबाकी भरली असती तर कारवाईची वेळ आली नसती, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
महापालिकेच्या महसूल व्यवस्थेचा मुख्य आधार असलेला मालमत्ता कर वसूल करण्यासाठी प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मोठे उद्दिष्ट ठेवले असून थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महापालिका हद्दीत हजारो कोटींची कर थकबाकी प्रलंबित असल्याने कर न भरणाऱ्या मालमत्तांवर सील आणि लिलावाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ही कारवाई उपायुक्त (कर) बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या थकबाकीबाबत वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कठोर निर्णय घेण्यात आल्याची माहिती कर अधीक्षक जयराम शिंदे यांनी दिली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊनच कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूण देयकात मोठी वाढ झाल्याचेही समोर आले आहे. अनेक नोटिसांनंतरही कर न भरल्याने कारवाई अपरिहार्य ठरल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, या संस्थेत सुमारे 550 हून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. या घटनेमुळे टिटवाळा परिसरात मोठी चर्चा रंगली असून कर वसुलीसाठी महापालिकेची कठोर भूमिका अधोरेखित झाली आहे. मात्र या कारवाईचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.