

मुंबई : गेल्या दोन ते तीन शैक्षणिक वर्षांपासून कोणतीही विद्यार्थी नोंदणी न झालेल्या तसेच कालबाह्य ठरलेल्या अभ्यासक्रमांवर मुंबई विद्यापीठाने मोठा निर्णय घेत 304 परीक्षा बंद करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये शून्य नोंदणी असलेल्या 125 परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या 179 परीक्षांचा समावेश आहे.
या परीक्षा निष्क्रिय घोषित करण्यात आल्याने संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा यापुढे नियमितपणे घेतल्या जाणार नाहीत. यासंदर्भातील अभ्यासक्रमांची यादी जाहीर केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने 10 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय अमलात आणण्यात आला आहे. मागील दोन ते तीन वर्षांत एकही विद्यार्थी नोंदणी नसलेल्या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील 23, मानवविज्ञान विद्याशाखेतील 15, आंतरविद्याशाखीय 42 आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 45 परीक्षांचा समावेश आहे.
या परीक्षांना सलग शून्य नोंदणी असल्याने त्या बंद करण्यात येत आहेत. तसेच शून्य नोंदणी असलेल्या अभ्यासक्रमांसाठी भविष्यात कोणत्याही संलग्न महाविद्यालयाने विद्यार्थी नोंदणीचा प्रस्ताव दिल्यास त्या परीक्षा पुन्हा सुरू करण्याची तरतूद विद्यापीठाने ठेवली आहे. अशा वेळी परीक्षा कार्यक्रम जाहीर करणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षकांची नियुक्ती करणे आदी सर्व परीक्षा प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमानुसार राबविण्यात येणार आहे.
ज्या अभ्यासक्रमांचा कालावधी पूर्ण होऊन दहा वर्षांचा टप्पा ओलांडला आहे अशा 179 परीक्षांबाबत विद्यापीठाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. या परीक्षांचा समावेश विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील 10, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील 86, मानवविज्ञान विद्याशाखेतील 38 व आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या 45 परीक्षांमध्ये असून या परीक्षा यापुढे घेतल्या जाणार नाहीत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.