

भिवंडी : संजय भोईर
भिवंडी पालिका राजकारणात मागील 25 ते 30 वर्षांपासून प्रस्थापित असणारे व पालिकेच्या सत्ता सारीपाटावर ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, अशा प्रस्थापितांनी आपले गड शाबूत राखण्यात यश मिळवले आहे.ज्यामध्ये माजी महापौर जावेद दळवी, ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, बाळाराम चौधरी, मनोज काटेकर, नारायण चौधरी, निलेश चौधरी, यशवंत टावरे, प्रकाश टावरे यांना यश आले आहे.
माजी महापौर जावेद दळवी यांची ही सलग आठवी निवडणूक असून त्यांनी बंदर मोहल्ला सौदागर मोहल्ला, बाजारपेठ, ब्राह्मण आळी या परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये असलेल्या जनसंपर्काच्या जीवावर त्यांनी आपला दबदबा कायम राखला असल्याने भिवंडी विकास आघाडीच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. तर ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पद्मशाली समाजाचे वर्चस्व असणाऱ्या पद्मानगर परिसरात 1995 पासून सुरू केलेला राजकीय प्रवास अखंडित सुरू ठेवला असून त्याचा हा सहावा विजय आहे. त्यांनी डबल हॅट्रिक केली आहे. विशेष म्हणजे त्यांना प्रत्येक निवडणुकीत पद्मशाली समाजातून आव्हान देण्यात आले. पण त्याच समाजाला आजपर्यंत सोबत ठेवल्याने भाजपाचे संतोष शेट्टी यांना विजय मिळवणे सहज शक्य झाले आहे.
त्यासोबत ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी, मनोज काटेकर यांनी टेमघर कामतघर येथील आपला दबदबा राखत डबल हॅट्रिक विजय साजरा केला आहे. भाजपाचे नारायण टावरे, निलेश चौधरी, प्रकाश टावरे यांनी सुद्धा पालिका पहिल्या निवडणुकी पासून अनुक्रमे ताडाळी, नारपोली या परिसरात दबदबा राखत यश मिळवत सहाव्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर यशवंत टावरे यांनी सुद्धा सलग तिसरा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पाच हजार पेक्षा अधिक मते मिळवून विजय मिळविण्याचा मान दोघा विजयी उमेदवारांनी पटकावला आहे. प्रभाग 23 मधील भाजपा उमेदवार नारायण रतन चौधरी यांनी अपक्ष उमेदवार रविकांत पाटील यांचा तब्बल 7038 मतांनी पराभव केला आहे. तर प्रभाग 9 मध्ये काँग्रेस उमेदवार मोमिन तारीक अब्दुल बारी यांनी शिवसेना पक्षाचे माजी स्थायी समिती सभापती माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचे बंधू संजय म्हात्रे यांचा 5231 मतांनी पराभव केला आहे.
प्रभाग क्रमांक एक या गोकुळ नगर, कोंबडपाडा संगम पाडा, म्हाडा कॉलनी या प्रभागावर वर्चस्व राखण्यात कोणार्क विकास आघाडीचे महापौर दांपत्य म्हणून ओळखले जाणारे विलास आर पाटील त्यांच्या पत्नी प्रतिभा विलास पाटील यांनी विजय पटकावत वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. तर त्यांचा मुलगा अँड मयुरेश हा जायंट किलर ठरला असून त्याने आमदार पुत्राचा केलेला पराभव हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. 1991 पासून कोंबडपाडा गोकुळ नगर विभागाचे नेतृत्व करण्यास विलास आर पाटील सुरवात केली ती अव्याहतपणे. तेव्हापासून सलग सात विजय विलास आर पाटील यांनी मिळवून येथे डबल हॅट्रिक केली आहे.तर त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांनी 2012 पासून सलग तिसरा विजय मिळवत हॅट्रिक केली आहे.
पालिका निवडणुका या बऱ्याच वेळा राजकीय पक्षांपेक्षा वयक्तिक नातेसंबंध, हितचिंतक यांच्या जीवावर स्वतःची प्रतिमा जपणाऱ्यांना विजय मिळवून देत असताना राजकीय पक्ष हे निमित्त मात्र ठरतात.त्यांच्यावर निसटता व भरघोस मतांनी विजय मिळवणे सहज शक्य होत असते. भिवंडी पालिका निवडणुकीत चार जणांनी शंभरहून कमी मतांनी निसटता विजय मिळवला आहे.
प्रभाग 6 अ वैभव भोईर (भाजपा) यांनी 6257 मते मिळवत परवेज मोमीन (भिवंडी विकास आघाडी) यांचा 98 मतांनी पराभव केला.तर याच प्रभागात 6 ब मध्ये रिशिका राका (भिवंडी विकास आघाडी) यांनी 6161 मते मिळवत दक्षाबेन पटेल ( भाजपा) यांचा 27 मतांनी पराभव करीत विजय मिळवला आहे.
प्रभाग 7 क मध्ये रेश्मा अन्सारी (काँग्रेस) यांनी 6831 मते मिळवत दीपाली भाई (सप) यांचा 74 मतांनी पराभव केला. तर प्रभाग 22 क मध्ये नितेश नामदेव ऐनकर (अपक्ष) यांनी 6075 मते मिळवत श्याम मनसुखराय अग्रवाल (भाजपा) यांचा 21 मतांनी पराभव केला आहे. प्रभाग 22 मध्ये श्याम अग्रवाल यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यावरून दोन्ही गटात मतमोजणी केंद्रावर मोठा गदारोळ दोन्ही बाजूने करण्यात आला होता.
या निवडणुकीत आमदार महेश चौघुले यांनी मुलासाठी येथील निवडणूक प्रतिष्ठेची करीत या परिसरात साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करीत प्रचारावर भर दिला. याच प्रभागात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी तसेच हाणामारी व शिवीगाळ केल्या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. विशेषतः मतदानाच्या दिवशी या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे या भागात सकाळपासून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे या प्रभागात प्रचंड तणावपूर्ण शांततेत मतदान पार पडले. तर सायंकाळी साडे पाच वाजता आमदार पुत्र मित चौघुले यांनी परिसरात फटाके फोडून विजयी होत असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. परंतु या प्रभागात पुन्हा एकदा विलास पाटील यांचाच करिष्मा दिसून येत अँड मयुरेश पाटील यांनी 7469 मते मिळवत आमदार पुत्र मित चौघुले यांचा 1695 मतांनी पराभव करत जायंट किलर ठरले आहेत.