

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : खासगी संस्थेला पेपर सेट करण्याचे काम न देता यापुढे म्हाडाच परीक्षा घेणार असल्याची मोठी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पेपर फुटीबाबत माझ्याकडे तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या, त्यामुळे मी स्वतः आणि पोलीस यंत्रणा यांनी योग्य तपास करून पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
विशेष म्हणजे पुण्यात तब्बल 2 लाख पोलिसांची परीक्षा घेणारी हीच संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून असा प्रकार होणे अनाकलनीय असल्याचे आव्हाड म्हणाले. म्हाडाचा पेपर फुटला नसून गोपनीयतेचा भंग झाला असून तशाप्रकारचा गुन्हा संबंधित संस्थेच्या विरोधात नोंदवण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
म्हाडाची परीक्षा रद्द होणार असे ट्विट करून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राज्यात विरोधात बसलेल्या भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच परिक्षेसाठी लांबून आलेल्या विद्यार्थ्यांनीही राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले. रविवारी म्हाडाच्या परिक्षा घेण्यात येणार होती. मात्र, पेपर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाला मिळाली असल्याने पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे पेपर फुटण्यापूर्वीच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. आव्हाड म्हणाले की, प्रश्नपत्रिकेबाबत एकाच व्यक्तीला माहिती होती. प्रश्नपत्रिका छपाईला गेल्यावर संबंधित कंपनीने त्या प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेऊ नयेत, असे स्पष्ट निकष असतानाही या कंपनीच्या मालकाने सदर प्रश्नपत्रिका आपल्या ताब्यात ठेवली. त्याने गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिक्षेत काही गैरप्रकार होणार असल्याचा संशय आपणाला या आधीच आला होता. त्यामुळेच आपण तीन दिवसांपूर्वीच गैरप्रकार आढळल्यास परीक्षा रद्द करण्याचा इशारा दिला होता.
पेपर फोडणाऱ्या काही टोळ्या सध्या कार्यान्वित आहेत. त्या उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. म्हाडा आणि पोलिसांनी एकत्रितपणे ती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पेपर फुटण्याच्या आधीच आपण परीक्षा रद्द करण्यात आली. जर, पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ती नामुष्की ठरली असती. शिवाय, अभ्यास करणाऱ्या परिक्षार्थींवर अन्यायकारक ठरले असते. हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस एकाचवेळेस कामाला लागले आणि वशिल्याचे तट्टू म्हाडामध्ये जाण्यापासून रोखण्याचे काम केले.
वास्तविक पाहता, या मध्ये मी मध्यस्थी करण्याची गरज नव्हती. पण, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमापोटी आपण आक्रमक भूमिका घेतली. दोन दिवसांपूर्वीच याच कंपनीने पुणे पोलीस दलाची परीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास तरी कसा दाखवणार? असा सवाल करून परीक्षा रद्द केल्याबद्दल आपण विद्यार्थ्यांची माफी मागत आहोत. मात्र, ही परीक्षा रद्द करून, वशिल्याचे तट्टू बाजूला सारून हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षताही म्हाडा आणि पोलिसांनी घेतली आहे, जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करणार..
परिक्षार्थींकडून घेतलेले शुल्क परत करण्यात येणार असून आगामी परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी माहिती माहिती देखील आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आव्हाड यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचलं का?