तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मध्य रेल्वेचे काम बंद पडणार | पुढारी

तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मध्य रेल्वेचे काम बंद पडणार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

रेतीबंदर येथील पादचारी पुलाच्या बाबतीत रेल्वेकडून जी भूमिका घेतली जात आहे; ती बेजबाबदारपणाची आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच 50 जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जर त्वरीत रेतीबंदर पादचारी पुलाचे काम सुरु केले नाही, तर, कळवा आणि मुंब्र्यातील पाचव्या- सहाव्या मार्गाचे कामच होऊ देणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

पादचारी पुलाचे भूमिपुजन झाल्यानंतर पाच वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरु होत नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत. त्या विरोधात आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

रेतीबंदर येथे गेल्या पाच वर्षात 50 जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेला आहे. रेल्वेने पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपुजन केले होते. त्यानंतर लगेचच या पुलाचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात जे 50 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याची जबाबदारी मध्य रेल्वेला घ्यावीच लागेल. त्यामुळे त्वरीत पादचारी पुलाचे काम सुरु करावे; अन्यथा, पुढील 8 दिवसात आम्हाला रेल्वे बंद करावी लागेल. अतिशय उग्र आंदोलन रेल्वेच्या विरोधात होईल. एवढेच नाही तर रेल्वेने जे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरु केले आहे. ते कामही आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

रेल्वेने पादचारी पुलाच्या जागेत बदल केला असल्याचा खुलासा केला आहे. याबाबत विचारले असता, रेल्वेकडून शंभर टक्के खोटे बोलले जात आहे. अशा पद्धतीचा कोणताही बदल करण्यात आलेला नाही; त्यामुळेच आपण पुन्हा एकदा ठामपणे म्हणत आहोत की रेतीबंदर परिसरात जे 50 लोक अपघातात मृत्यमुखी पडले आहेत. त्यास मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच जबाबदार आहे. ठामपाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. गेले पाच वर्ष चर्चाच सुरु आहे का?, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button