ठाणे : मॉलमधील मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक | पुढारी

ठाणे : मॉलमधील मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : इतिहासाचे विद्रुपीकरण केलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह ठाण्यातील विवियाना मॉल मध्ये जाऊन बंद पाडला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि आव्हाड यांनी त्याची सुटका केली, असे सीसीटीव्हीमध्ये दिसत असताना आज  (दि.११)  ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलावून यांच्यावर अटकेची कारवाई केली. ही अटकेची कारवाई वरिष्ठांच्या दबावामुळे झाल्याचा आरोप करीत जो मी गुन्हा केलाच, नाही तो मरेपर्यंत कबूल करणार नाही, अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. त्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले आहे.

हर हर महादेव चित्रपट बंद पाडल्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये राडा रंगला होता. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह १०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी आव्हाड यांच्यासह १२ जणांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. आज दुपारी वर्तकनगर पोलिसांनी त्यांना फोन करून पोलीस ठाण्यात येता की, पोलीस घरी पाठवू, असे बजावले. त्यानंतर आव्हाड हे दुपारी एक वाजता वर्तकनगर पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. ही कारवाई वरून आलेल्या दबावामुळे होत असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितल्याचा दावा माजी मंत्री आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये केला आहे.

दरम्यान, आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले की, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हाला अटक करावी लागेल.

हेही वाचलंत का ? 

Back to top button