सांगली : पुढारी वृत्तसेवा : MSRTC : सर्व एस.टी. कर्मचार्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सांगली आगाराच्या एस.टी. कर्मचार्यांनी पुन्हा एकदा एस.टी.वाहतूक बंद व संपाची हाक दिली आहे. बुधवारी पहाटेपासून या संपाला सुरुवात होणार आहे. कृती समितीच्या सर्व मागण्या महामंडळाकडून मान्य करून देखील पुन्हा संप सुरू होणार असल्याने याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
विविध मागण्यांसाठी एस.टी.कर्मचार्यांनी संपाचा इशारा दिला होता. एस.टी.ची चाके थांबताच उच्चस्तरीय बैठकीमध्ये कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कर्मचार्यांना बोनस, अॅडव्हान्स पगार इत्यादी देण्यात आले आहे. अद्याप सण उचल मात्र देण्यात आली नसून ते येत्या दोन-तीन दिवसात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान एस.टी.कर्मचार्यांचे महामंडळातून शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी आटपाडी येथे गेल्या पाच दिवसांपासून कर्मचार्यांचा संप सुरू आहे. त्याच धर्तीवर सांगली आगारातील कर्मचारी देखील बुधवारी पहाटेपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर जात आहेत. त्यामुळे सांगलीत पहाटेपासून एस.टी. वाहतूक पुन्हा खोळंबण्याची शक्यता आहे.
दरम्यान हा निर्णय महामंडळ स्तरावरील नसून शासन स्तरावरील आहे. कृती समितीच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. संप करण्यापूर्वी सहा दिवसांची नोटीस देणे गरजेचे असते. परंतु ती न देताच कर्मचार्यांनी संप पुकाराला आहे, त्यामुळे हा संप बेकायदेशीर आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय करूनये असे आवाहन सांगली विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी कर्मचार्यांना केले आहे.