शरद पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित षड्यंत्र : जयंत पाटील | पुढारी

शरद पवारांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित षड्यंत्र : जयंत पाटील

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. यामागे कोणाचा हात आहे. याचा कर्ता करवीता कोण आहे, हे लवकरच जनतेसमोर उघड झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे बोलताना दिला. सर्व मार्गांचा अवलंब करुनही सत्ता मिळत नसल्याने काही लोक आता या थरापर्यंत पोहोचले आहेत, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या वतीने येथे जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री जयंत पाटील म्हणाले की, हल्ला करणारे हे लोक एसटी कर्मचारी असूच शकत नाहीत. हे हल्लेखोर कोणीतरी पाठवलेली टोळीच आहे. यामागे नेमके कोण आहेत, हल्ल्याआधी सदावर्ते कोण कोणाला भेटला होता. हे पोलीस तपासात पुढे येईलच. हल्लेखोर येताना पत्रकारांना बरोबर घेवून आले होते. त्यामुळे हे सर्व पूर्वनियोजित कटकारस्थानच आहे.

ते म्हणाले , महाविकास आघाडी सरकार पडणार, पडणार म्हणणारे लोक सरकार पडत नसल्याने अस्वस्थ आहेत. यंत्रणा मागे लावूनही काही होत नसल्याने हे लोक या थरापर्यंत पोहोचले आहेत. राज्यात यापूर्वी असा प्रकार कधीच घडल‍ा नव्हता. आमचे नेते शरद पवार यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे . एखादे आंदोलन, प्रश्न सुटण्याए‍वजी तो कसा चिघळेल, असा प्रयत्न काहींचा सुरु आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, चिमण डांगे, खंडेराव जाधव, संदीप पाटील, दादासो पाटील, भगवान पाटील, अरुण कांबळे, सुभाष सुर्यवंशी, जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, रोझा किणीकर , प्रियांका साळुंखे, शुभांगी पाटील, सुनिता सपकाळ व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?  

 

Back to top button