बाणूरगड : बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न | पुढारी

बाणूरगड : बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

विटा(सांगली); पुढारी वृत्तसेवा : बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. बाणूरगड येथील कार्यक्रमात स्वराज्यामधल्या योद्ध्यांची स्मारकं झाली पाहिजेत, पण ती नुसती स्मारकं न राहता प्रेरणास्थानं बनली पाहिजेत अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

खानापूर तालुक्यातील बाणूरगड (जि.सांगली) येथे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले.

अधिक वाचा 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत असून भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर, जि. प. अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जि.प उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर, उपसरपंच कांताताई गायकवाड प्रमुख उपस्थित होते.

बहिर्जी नाईक यांचे स्मारक हे प्रेरणास्थान बनावे

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, दीर्घकाळ परकियांची राजवट आणि अनागोंदी अनुभवणार्‍या महाराष्ट्राला एका चैतन्यसूत्रात बांधण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. महाराष्ट्र संस्कृतीला आत्मभान आले, ते या स्वराज्यामुळेच.

युगप्रवर्तक शिवछत्रपतींनी एक आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. अर्थातच त्यांच्या राजवटीत गुप्तहेरांचे जाळे अतिशय भक्कम होते. सुमारे तीन ते चार हजार गुप्तहेरांचे नेतृत्त्व बहिर्जी नाईक यांनी केले. बहिर्जी नाईक यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या होत्या.

अधिक वाचा 

स्वराज्य उभा करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष होते. समाजातील प्रत्येक घटकाशी सामाजिक बांधिलकी जोपासत त्याला राजव्यवस्थेमध्ये महाराजांनी समान न्याय दिला. शिवकालीन गुप्तहेरांची एक भाषा बहिर्जी नाईक विकसित केली.

गुप्तहेरांचे संभाषण कौशल्य हे वेगळ्या पध्दतीचे होते. त्यावेळी आजच्यासारख्या आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु, गुप्तहेर खात्याची एक वेगळी भाषा बहिर्जी नाईक यांनी स्वतः विकसित केली होती. त्या फक्त त्यांच्या गुप्तहेरांना कळत होत्या.

त्याकाळात केवळ संशयावरून हत्या केली जात असे, परंतु त्याकाळात अतिशय पक्की खबर बहिर्जी नाईक काढून आणत असत. त्यांना कधीही पकडता आले नाही. स्वराज्याच्या सेनानीचे हे अतिशय सार्थ स्मारक ठरेल.

आमदार पडळकर यांनी ५० लाख तर आमदार सदाभाऊ खोत यांनी २५ लाख रुपये आपल्या फंडातून दिले आहेत. एकूण साडेतीन कोटी रूपये खर्च करून हे स्मारक उभारले जात आहे. भाजपचे आमदार खासदार या स्मारकाला उरलेला निधी देतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अधिक वाचा 

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत गुप्तहेर बर्हिजी नाईक

आमदार पडळकर हे यावेळी म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत गुप्तहेर बर्हिजी नाईक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांचे उचित स्मारक करण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला. माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे स्मारक साकारले जाणार आहे.

या स्मारकासाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या फंडातून २५ लाख रुपये दिले आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील भाजपचे अनेक आमदार या स्मारकासाठी आपल्या फंडातून निधी देणार आहेत.

यावेळी जि. प. चे वित्त व बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, जि.प.सदस्य अरुण बालटे, मोहन रणदिवे, आटपाडी पंचायत समिती सभापती जयवंत सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती डॉ. भुमिका बेरगळ, माजी उपसभापती तानाजीशेठ यमगर, माजी उपसभापती रुपेश पाटील, भाजपाचे आटपाडी तालुकाध्यक्ष उमाजी सरगर, भाजपाचे खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, विष्णूपंत अर्जून, माऊली हळणवर, मुन्नाभाऊ चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

पाहा : कोल्हापूरमधील प्रति -पंढरपुर नंदवाळमध्ये विठ्ठल कसे प्रकटले?

Back to top button