वाहतूक पोलिसांना रात्रपाळी; वर्दळीच्या भागांत मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियोजन

वाहतूक पोलिसांना रात्रपाळी; वर्दळीच्या भागांत मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियोजन
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील काही भागांत मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांना रात्रपाळीत काम करावे लागणार आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम विभागून देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. वाहतूक पोलिसांना यापूर्वी रात्रपाळीत काम करावे लागत नव्हते.

सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत वाहतूक पोलिसांना एकाच पाळीत काम करावे लागत होते. पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना रात्रपाळीत काम करावे लागते. रात्री नऊनंतर वर्दळ कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकात मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. अगदी मध्यरात्रीही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांना मध्यरात्री दोनपर्यंत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

अनेक रस्त्यांवर विकासकामे सुरू आहेत. मेट्रोचे कामदेखील शहरात सुरू आहे. शहरातील वाहनांची संख्या वाढल्यामुळे काही रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. यामुळे वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे, असे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.

या रस्त्यांवर असणार पोलिस

कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, जंगली महाराज रस्ता, बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, स्वारगेट, मार्केट यार्ड, हडपसर, कोथरूड भागातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. या विभागातील वाहतूक पोलिसांना मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियोजनाचे काम करावे लागणार आहे. या भागातील सिग्नल यंत्रणा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. किरकोळ किंवा गंभीर अपघात झाल्यास रात्रपाळीत नियुक्तीस असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

वाहतूक नियोजनाला प्राधान्य

पावसाळ्यात प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ होतो. झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतूक विस्कळीत होऊन ठिकठिकाणी कोंडी होते तसेच खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने सुरू असते. पावसाळ्यात वाहतुकीचे नियोजन करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. त्यानुसार वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने पोलिसांच्या कामाचे नियोजन केले आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना देखील सहकार्य करणे गरजेचे आहे.

                                                     – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news