कागल बा. ल. वंदूरकर: पहिलीच्या लहान मुलांच्या पाठीवरील चार पुस्तकांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दर तीन महिन्यांना नवीन एक पुस्तक मुलांच्या हाती येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पुस्तकाबाबत मुलांमध्ये उत्सुकता लागलेली होती. या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आणि भावविश्वाशी निगडित असलेल्या चित्रांना तसेच प्राणी, माझे कुटुंब, पाणी, खेळ, अनुभव यांना जोड देण्यात आलेली आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये असलेले हे पुस्तक मुलांच्या हाती पडल्यानंतर दिवसभर मुले पुस्तक चाळण्यामध्ये मग्न होती.
एकात्मिक व द्विभाषिक बालभारती इयत्ता पहिली मराठी माध्यम १-२-३-४ अशा चार भागांमध्ये पुस्तक विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. दर तीन महिन्यांना वेगळे पुस्तक दिले जाणार आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी असलेले पुस्तक यंदाच्या शैक्षणिक वर्ष सुरू झालेल्या पहिल्या दिवशी बुधवारी विद्यार्थ्यांना देण्यात आले. यामध्ये भारताचे संविधान, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, खायला काय आवडते, मानवाचे अवयव, ज्ञानेंद्रिये ओळख, स्वच्छतेसाठी कोण मदत करते, चांगल्या सवयी कोणत्या, छोटे भाऊ-बहीण, दिनचर्या, विज्ञान, कार्यानुभव, मी आणि माझे कुटुंब, प्राणी, पाणी, वाहतूक तसेच कृती, खेळ, चित्रकला, गोष्टी, गाणी यांचा उपयोग करून अध्ययन आणि अध्यापन पुस्तकातून केले जाणार आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात बालभारती, इंग्रजी, गणित, खेळ अशी चार पुस्तके होती. दप्तराचे ओझे कमी करण्याकरिता शासनाने चार पुस्तकांऐवजी एका पुस्तकाची निर्मिती केली आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी वापरलेले पुस्तक घरी ठेवले जाणार आहे. शाळेत जाताना विद्यार्थ्यांनी एकच पुस्तक आणायचे आहे. वर्षभर चार भागांत शिकवले जाणार आहे.
हेही वाचा