टाकळी हाजीच; पुढारी वृत्तसेवा : सविंदणे (ता. शिरूर) येथे शुक्रवारी दि. २२ रात्री ८ च्या सुमारास वीज पडून सुभाष धोंडीबा खैरे या शेतकऱ्याच्या तीन गाई जागीच ठार झाल्या. तर लंघेदरा येथे विद्युत रोहीत्रावर वीज पडून विद्युत रोहित्र खराब झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या असून रात्रभर वीज नव्हती.
शिरूर तालुक्यातील बेट भागात विजेच्या कडकडाट, वादळासह अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी नुकतेच काढलेले कांदे भिजले आहेत. मका, घास पीक भुईसपाट झाले. झाडावरील आंबे, डाळिंब गळून पडले. अवकाळी वादळी पावसाने विजेचा लंपडाव, कमी बाजारभाव यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
सविंदणे येथील कारभारी नरवडे, अक्षय नरवडे यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत. सुभाष खैरे या शेतकऱ्याच्या तीन गाई वीज पडून जागीच ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे तीन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसुल व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच सोनाली खैरे, रा. कॉ. युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?