

खोर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी (दि. 20) वरवंड केंद्रात उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात सुरुवात झाली. या केंद्रावर एकूण 475 विद्यार्थी परीक्षा देत असून, परीक्षा श्री गोपीनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे परीक्षा पार पडत आहे. पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर शांततेत पार पडला.
वरवंड केंद्रांतर्गत श्री गोपीनाथ विद्यालय वरवंड, श्री सद्गुरू विद्यालय देऊळगावगाडा, श्री त्रिंबक दिवेकर विद्यालय कडेठाण, नागनाथ विद्यालय वरवंड, आदर्श विद्यालय कानगाव, काकासाहेब थोरात विद्यालय धायगुडेवाडी या 6 शाळांचा समावेश आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून केंद्र परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, केंद्र प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कोणतीही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही. परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वरवंड ग््रााम शिक्षण संस्थेचे संचालक अंकुश दिवेकर, केंद्र संचालक प्राचार्य अनिल शेलार, उपकेंद्र संचालक महादेव कुदळे, आर. के. शितोळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याला वळण देणारी दहावीची म्हणजे एसएससी बोर्डाची परीक्षा शुक्रवारी (दि. 20) सुरू झाली आहे. या निमित्त पुणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मोठी लगबग पहायला मिळाली. केंद्रांवर परीक्षेसाठी सर्व तयारी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे शिक्षकांसह गावोगावच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या वर्षीपासून बोर्डाकडून प्रश्नपत्रिकांना डिजिटल लॉक केले आहे. या प्रयोगाबाबतही जिल्ह्यात उत्सुकता दिसून आली.
मोरगाव येथील श्री मयूरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 20 फेबुवारी ते 18 मार्चपर्यंत होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यालयातील 18 खोल्यांचे नियोजन केले आहे. या केंद्राचे केंद्र संचालक अर्जुन कोकरे, सहाय्यक संचालक संदीप जगताप व मनोज खोमणे आहेत. येथे परिसरातील सात गावांतून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतात.
यामध्ये मोरगाव, मुर्टी, लोणी-भापकर, पळशी, आंबी, बाबुर्डी, खंडू-खैरेवाडी गावांचा समावेश आहे. यंदा येथे 438 विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य अर्जुन कोकरे यांनी सांगितले. परीक्षेच्या पहिल्या दिवशी मोरगाव ग््राामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच पोपटराव तावरे, रमेश तावरे, ग््राामपंचायत सदस्य अक्षय तावरे, तंटामुक्त समितीचे प्रमुख प्रकाश तावरे, सल्लागार समितीचे सदस्य मनोहर तावरे व यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. येथील परीक्षा केंद्रावर कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या दृष्टीने विद्यालयाने खबरदारी घेतली आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात आहे.