

पिंपरी : मेट्राच्या कामाचा विस्कळीतपणा, अवाढव्या पदपथाची रुंदी, अर्धवट बीआरटीची स्थिती, ग्रेडसेरपेटरमधील इन आउटचा परस्पर बदल यासह प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांचा प्रयोग अशा अनेकानेक कारणांमुळे शहरातून जाणारा जुन्या पुणे-मुंबई मार्गावर कोंडीमुळे रस्त्याचा घोट घेतला जात आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सुरू असलेला पोलिस, प्रशासनाच्या खेळामुळे नागरिकांचा अर्धाअधिक वेळ कोंडीत जात आहे. परिणामी, शहराचे सर्वांधिक वेगाचा रस्ताच अडथळा बनला आहे.
औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील चारही बाजूला वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यात कुचकामी ठरलेली सार्वजनिक वाहतूक सेवा, नियोनशून्य रस्त्याचा विकास, बीआरटीची दयनयीय अवस्था, अर्धवट अवस्थेतील कामे याचबरोबर ग्रेडसेपरेटमधील वारंवार बदलामुळे दापोडी ते निगडी हा मार्ग आता वाहतूक कोंडीचा स्पॉट होवू लागला आहे. वाहनांना शहरातून न जाता थेट मुंबई मार्गापर्यंत जाता यावे, यासाठी करोडो रुपये खर्च करुन ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. मात्र, आत्तपर्यंत या रस्त्यामधील इन, आउटमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत.
दरम्यान, ग्रेड सेपरेटरमध्ये ठराविक उंचीचे वाहने जाऊ शकत नाही. त्यामुळे ती वाहने सर्व्हिस रस्त्यावर येतात. परिणामी, आधीच अरुंद, अतिक्रमण, बेशिस्त वाहनांनी पॅक असलेला रस्त्यावर या वाहनांमुळे अधिकच कोंडी निर्माण होते. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रस्त्यालगत असलेल्या दुकानांना पार्किंग नसल्याने त्याची वाहनेदेखील रस्त्यावरच लावण्यात येतात.
निगडीतून पुण्याकडे जाताना तीन प्रमुख चौकात वाहनचालकांना अक्षरशः शिक्षा असल्यासारखे 15 ते 20 मिनिटे थांबावे लागते. आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन आणि मुख्यतः मोरवाडी चौकात सर्वांधिक कोंडी होते. ग्रेड सेपरटेरचा वापर कमी झाल्याने सर्व्हिस रस्त्यावर अधिक वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे चौक पार करणे एक दिव्य ठरले आहे.
महापालिकेने या मार्गावर वेगवेगळया विकासकामांच्या निर्णय वाहनाचालकांना कोंडीत अडकणे कारणीभूत झाला आहे. प्रशस्त पदपथ, चौकात उभारलेले आयर्लंड, सिमेंटचे ब्लॉक, बीआरटी मार्ग आणि मेट्रोच्या कामाचा अडथळा यामुळे वाहनचालकांना नाहक या कोंडीत अडकून पडावे लागते.
पुण्यातील वाहन कोंडीतून कसाबसा बाहेर पडलेला वाहनचालक आता पिंपरीतील वाहतुकीमध्ये अडकून पडतो. परिणामी, त्याचा वेळ, इंधन खर्ची पडत असून, मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्याची दुरावस्था आणि बेशिस्त वाहनामुळे अनेकदा छोटे मोठे अपघातदेखील घडत आहेत.
जुन्या पुणे-मुंबई मार्गावर अलीकडे मोठे टॉर्वर, मॉल्स, हॉटेल उभारले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पार्किंगची पुरेशी सोय नाही. परिणामी, ती वाहने रस्त्यारवच उभी केली जातात. आकुर्डी, मोरवाडी, चिंचवड स्टेशन येथे ही समस्या अधिक प्रमाणता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
महत्त्वाचे रस्ते त्यावर येणारी वाहनांची संख्या याचा कोणताही अभ्यास न करता, रस्त्याची उभारणी केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे पोलिस प्रशासन, महापालिका याचबरोबर मेट्रो प्रशासनचा समन्वय नाही. परिणामी, एकाचा उपायोजना दुसऱ्याला अडचणीच्या ठरतात. तर, एकवाक्यात होत नाही.
या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी तशा सूचना दिल्या आहेत. रस्त्यावरील धोकादायक बॅरिकेट्स हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतर मार्गावर बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू आहे. महापालिकेला काही चौकातील बदलाबाबत पुनर्विचार करण्याबाबतचे पत्र दिले आहे.
विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक