

सासवड: पुरंदर तालुक्यात दुष्काळाची झळ दिवसेंदिवस तीव होत असून, आता शेतशिवारातील हिरवा चारा संपुष्टात आला आहे. अपुऱ्या पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीने तळ गाठला आहे. जनावरांसाठी आवश्यक असलेल्या कडब्याचे दर गगनाला भिडल्याने पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यंदा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप आणि रब्बी हंगामावर मोठा परिणाम झाला. अनेक भागातील ऊस पिके पाण्याअभावी वाळून गेली. जनावरांसाठी उपलब्ध होणारा उसाचा चारा कमी पडू लागला आहे. त्यामुळे पशुपालकांचा भर आता कडबा, मका आणि व्हंडीच्या चाऱ्यावर वाढला आहे. सध्या कडब्याचा दर प्रतिशेकडा पेंढी तब्बल 3,500 ते 5,000 रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे.
जनावरांसाठी पोषक आहार मानल्या जाणाऱ्या ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. ज्वारीच्या पेरणीचे क्षेत्र उसाच्या वाढत्या लागवडीमुळे घटल्याने कडब्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी अनेक शेतकरी कडब्याची थेट शेतातूनच विक्री करत असून, ज्यांच्याकडे जनावरे नाहीत ते शेतकरी जादा दराने कडबा विकताना दिसत आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या कडबा खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. ज्या पशुपालकांकडे जनावरांची संख्या अधिक आहे, ते पुढील टंचाई लक्षात घेऊन कडबाकुट्टी करून पोत्यांमध्ये साठवून ठेवत आहेत.
चाऱ्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी आतापासूनच जनावरांच्या जगवणुकीची चिंता करत आहेत. दरम्यान, तालुक्यातील जलस्रोतही वेगाने आटत चालले आहेत. वीर धरणातील पाणीसाठा आवर्तन सोडल्यामुळे झपाट्याने घटला असून, अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. पाणीटंचाई आणि चाऱ्याचा तुटवडा या दुहेरी संकटामुळे ग््राामीण भागातील शेतकरी आणि पशुपालक हतबल झाले आहेत.
मागणीत वाढ; उपलब्धता अपुरी
मका आणि व्हंडी पिकांचे क्षेत्र यंदा कमी झाल्याने चाऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दूध व्यवसाय व शेळीपालन करणारे शेतकरी सकस आहार म्हणून कडब्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी असल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. बहुतांश भागात मका आणि व्हंडीच्या चाऱ्याचे दर दोन ते चार हजार रुपये प्रतिगुंठ्यापर्यंत पोहोचले आहेत. आगामी काळात चाऱ्याचे संकट आणखी तीव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.