

इंदापूर: जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (दि. २०) इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील शेवटचा मुक्काम आटोपून सोलापूर जिल्ह्याकडे रवाना झाला. रवाना होण्यापूर्वी नीरा नदीच्या पात्रात पादुकांना पवित्र स्नान घालण्यात आले. रविवारी (दि. १९) इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी मुक्कामी विसावली होती. नीरा स्नानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
सोमवारी सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने तसेच स्थानिक प्रमुख ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते नीरा नदीपात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. नदीपात्रात पादुकांवर पाणी, दही, दुधाचा अभिषेक, चंदन, हळदीचा अभिषेक करून अष्टगंध, बुक्का लावून आरती करण्यात आली. यावेळी हजारो वैष्णवांनी तुकोबा तुकोबाचा जयघोष केला व पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
नीरा स्नानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील अकलूज येथे प्रवेश केला. सकाळच्या या रम्य सोहळ्याने वैष्णव आनंदले. या वेळी हजारो वैष्णवांनी नदीपात्रात डुंबण्याचा आनंदही साजरा केला.
प्रवेशापूर्वी सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची सीमा असलेल्या नीरा नदीपात्रात तुकोबारायांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्याची परंपरा आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील चार मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात जात असताना पुणे जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जड अंतःकरणाने सोहळ्यास निरोप दिला.
सोलापूर जिल्ह्यात सोहळ्याने प्रवेश केल्यानंतर संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे तिसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात पार पडणार आहे.