

पुणे: मॉन्सूनच्या हजेरीनंतर राज्यातील मोसंबी आणि डाळिंबाचा हंगाम बहरू लागला आहे. पुणे विभागातून डाळींब तर छत्रपती संभाजीनगर येथून आंबेबहरातील मोसंबीची आवक सुरू आहे. पावसामुळे दर्जेदार फळे बाजारात दाखल होत आहे.
त्यातुलनेत मागणी कमी असल्याने डाळिंबासह मोसंबीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. याउलट आवक घटून मागणी वाढल्याने पपईच्या भावात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवा येत असल्याने कलिंगड, खरबूज आदी थंडगार फळांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. याखेरीज, बाजारात दर्जेदार लिंबे दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, त्यांना अपेक्षित मागणी नाही.
बाजारात दाखल होत असलेल्या बहुतांश फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे गत आठवड्यातील दर टिकून असल्याचे सांगण्यात आले. फळबाजारात रविवारी (दि. १९) लिंबू ६०० ते ८०० गोणी, मोसंबी २५ ते ३० टन, संत्रा १ टन, डाळींब ४० ते ४४ टन, पपई २० ते ३५ टेम्पो, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू १०० गोणी, पेरु ३०० ते ४०० क्रेट, पिअर ५०० ते ६०० क्रेटस्, नासपती दीड ते दोन हजार पेटी, सिताफळ ६ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते ७००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३०० (४ डझन) : ५०-१३०, संत्रा : (१० किलो) : ३००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१८०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-३०, कलिंगड : १०-१२, खरबूज : १५-२५, पपई : २०-३५, चिक्कू (दहा किलो) : २००-६००, पेरु (२० किलो) : ३००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सिताफळ (१ किलो) : २०-१४०, नासपती (१६ ते १७ किलो) : १०००-१२००, पिअर (१० किलो) : १८००-२२००.