

पुणे: जिल्ह्यासह पुणे विभागात झालेल्या पावसामुळे स्थानिक पातळीवरील पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला आहे. स्थानिक उत्पादन घटल्याने पुण्याचा बाजार सध्या कर्नाटकातील बेळगावसह परराज्यांतून येणाऱ्या कोथिंबिरीवर अवलंबून आहे.
आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ५० रुपयांपर्यंत पोहचली असून, इतर पालेभाज्यांच्या दरातही पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाल्याने त्याही चाळिशीवर पोहचल्या आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाज्यांचे अडतदार राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, पावसामुळे शेतातील पालेभाज्या खराब होणे आणि दर्जेदार मालाचे प्रमाण घटणे, या कारणांमुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या मालाची टंचाई निर्माण झाली आहे. ग्राहकांकडून दर्जेदार मालालाच पसंती मिळत असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, मुळे, पालक आणि कांदापात यांच्या भावात वाढ झाली आहे.
मात्र, मागणी आणि पुरवठा यांचा समतोल असल्याने राजगिरा, पुदीना, अंबाडी, चुका आणि चवळईसह इतर पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. १९) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी आणि मेथीची ८० हजार जुडी आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार २० ते ४० रुपये, तर मेथीच्या जुडीला १० ते २५ रुपये भाव मिळाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
पावसाच्या तडाख्यामुळे स्थानिक उत्पादनाला मोठा फटका बसल्याने बाजारातील आवक घटली आहे. पावसानंतर पडलेल्या कडक उन्हाचा परिणाम पालेभाज्यांच्या प्रतवारीवरही झाला आहे. त्यामुळे बाजारात पालेभाज्यांची आवक होत असली तरी दर्जाअभावी भावात मोठी वाढ झाली आहे. येत्या आठवडाभरात स्थानिक भागातून पुन्हा पालेभाज्यांची आवक सुरू होईल. त्यानंतर दरात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाऊस वाढल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
चरण वणवे, पालेभाजी विक्रेते