

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या बी. ए. आणि बी. कॉम. परीक्षांचे निकाल तब्बल तीन महिने होत आले, तरी जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
परीक्षा विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पुढील दोन दिवसांत निकाल जाहीर न झाल्यास विद्यार्थी संघटनांकडून परीक्षा विभागासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर निकाल लावण्यास एवढा विलंब का होत आहे? याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाकडून मिळालेले नाही.
या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नाही तसेच शासकीय आणि खासगी नोकऱ्यांच्या अर्ज प्रक्रियेत निकालाची आवश्यकता असल्याने त्यांच्या संधी निसटत आहेत. विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले की, हा विलंब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असल्याने परीक्षा संचालकांच्या अपयशाला जबाबदार धरले जात आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या अंतिम चेतावणीनुसार, पुणे, नगर आणि नाशिक विभागातील सर्व रखडलेले निकाल दोन दिवसांत जाहीर करावेत; अन्यथा परीक्षा विभागासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या मुद्द्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.