चाकण, पुढारी वृत्तसेवा : भरधाव कंटेनर व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कडाचीवाडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. १८) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. तन्मय पंकज हरगुडे (वय १८, रा. साबळेवाडी, ता. खेड) व ओंकार कैलास साबळे (वय १८, रा. बहुळ, ता. खेड) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालय सुटल्यानंतर तन्मय आणि ओंकार हे दोघे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी निघाले होते. चाकण-शिक्रापूर रस्त्याने आपल्या ताब्यातील दुचाकीवरून (एमएच १२ क्यूएच १७१७) जात असताना कडाचीवाडी येथे पुढे जाणाऱ्या भरधाव कंटेनरला दुचाकीची धडक बसली. यामध्ये तन्मय आणि ओंकार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ चाकण येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चाकण पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या धक्कादायक घटनेने साबळेवाडी आणि बहुळ गावांवर शोककळा पसरली आहे. चाकण-शिक्रापूर रस्ता हा मागील काही वर्षांत मृत्यूचा सापळा झालेला आहे. या रस्त्यावर अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेलेले आहेत. मात्र, शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याचे काम होत नसल्याने अनेक निरपराध अपघात आणि मृत्यूच्या दाढेत येत आहेत. (Pune)