

पुणे: महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून चालणाऱ्या पाणी टँकर व्यवस्थेत गैरप्रकारांचा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले असून, मोफत पाण्याची विक्री, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीर चालक यामुळे ’टँकर माफिया’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून कडक नियमावली तयार करण्यासोबतच स्काडा सिस्टिम लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहर आणि उपनगरांमध्ये ज्या भागांत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नाही, त्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिका तब्बल 816 टँकर वापरत असून, त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, काही टँकर चालकांकडून महापालिकेकडून मोफत मिळणारे पाणी इतरत्र विक्रीसाठी वापरले जात असल्याचे प्रकार समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. याशिवाय, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेफिकीर वाहनचालना यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
महंमदवाडी परिसरात एका टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रश्नाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. टँकर चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून, अनेक चालकांकडे वैध परवाना नसल्याचे किंवा योग्य प्रशिक्षण न दिल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे या मनमानीला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून कठोर धोरण राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
यासंदर्भात गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही जोरदार चर्चा झाली. काही सदस्यांनी टँकरचा मुद्दा उपस्थित करत चालकांकडून नागरिकांच्या अंगावर टँकर घालण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी मांडल्या. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टँकरमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ नये, यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिका आयुक्तांकडून यासंदर्भात लवकरच नियमावली तयार करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
दरम्यान, टँकर कंत्राटदारांवर राजकीय नेत्यांचे किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचे वर्चस्व असल्याचा आरोप होत असून, त्यामुळेच आतापर्यंत कोणत्याही चालक किंवा मालकावर कठोर कारवाई झालेली नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे नवीन नियमावली केवळ कागदावर न राहता तिची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि बेशिस्त टँकर चालकांवर खऱ्या अर्थाने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.