

पुणे: जलसंपदा विभागाकडून पाणीकपातीबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर शहरात संभाव्य पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले असून, महापालिकेने यावर उपाययोजना आखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाणीबचतीच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे किंवा दिवसाआड पाणी देण्याचा पर्याय प्रशासनाकडून विचाराधीन असून, यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्यावर ताण येण्याची शक्यता असून, पाण्याचा वापर नियंत्रित ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास 10 ते 15 टक्के पाण्याची बचत होऊ शकते, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने मांडला आहे. तसेच, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्यायही चर्चेत असून, पुढील तीन महिन्यांसाठी तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेतील सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाणार असून, शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती, नागरिकांवर होणारा परिणाम आणि पर्यायी उपाययोजना, यांचा सखोल विचार केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि मर्यादित जलस्रोत, यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे महापालिकेसमोर मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर पाणीबचतीबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनकेले आहे.
याशिवाय पाणीगळती रोखणे, अपव्यय टाळणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देणे, अशा उपाययोजनाही राबविण्यात येणार आहेत. या उपायांमुळे संभाव्य पाणीटंचाईची तीवता काही प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. तथापि, नागरिकांच्या सहकार्याशिवाय ही परिस्थिती हाताळणे कठीण असल्याने सर्वांनीच पाणीवापरात संयम राखणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट केले आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण कसे राहते, यावर पुढील धोरण निश्चित होणार असल्याचेही नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
15 टक्के पाणीकपात करण्याची नोटीस
शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका प्रतिदिन 1 हजार 560 दशलक्ष लिटर पाणी धरणांतून घेते. पावसाला उशीर झाल्यास पाण्याची गरज भागविणे अवघड होणार असल्याने आत्तापासूनच नियोजन करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. महापालिकेने 15 टक्के पाणीकपात करावी, अशी नोटीस आल्याचे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात जलसाठा काही प्रमाणात अधिक आहे.
आठवड्यात एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास महिन्याला चार दिवसांचे पाणी वाचेल. पुढील तीन महिन्यांमध्ये 12 दिवसांचे पाणी वाचेल. यामध्ये 10 टक्के पाण्याची बचत होईल, तर दिवसाआड पाणी दिल्यास 25 टक्के पाण्याची बचत होईल.
नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका