

पुणे: पुण्यातील चार व्यावसायिकांना सलग खंडणीसाठी फोन आल्यानंतर पुणे पोलिसांनी दहा दिवसांच्या प्रयत्नानंतर एकाला अटक करण्यात यश मिळवले आहे. पावसाळी अधिवेशनात बिष्णोई टोळीच्या धमक्यांचे पडसाद उमटले. याप्रकरणी आता पवन कुमारला राजस्थान-पंजाब सीमेवरील परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला ट्रान्झिट रिमांडवर पुण्यात आणले जात आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उरुळी देवाची येथील एका स्टील व्यावसायिकाला दि. २२ जूनपूर्वी धमकी देऊन नंतर काही तासांत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. बिष्णोई टोळीच्या नावाने ५० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपींच्या पलायनाचा संपूर्ण मार्ग शोधत या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबारानंतर आरोपीने वापरलेली दुचाकी एका सोसायटीजवळ सोडून दिली.
त्यानंतर त्याने सलग दोन ऑटो रिक्षांचा वापर केला आणि पुढे कॅबने नाशिक गाठले. नाशिकहून तो बसने सुरतला गेला आणि तेथून राजस्थानमध्ये पळून गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याच्या हालचालींचा संपूर्ण मागोवा घेतला. राजस्थान-पंजाब सीमेवरून अटक ; तांत्रिक पाळत आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजस्थानमध्ये लपल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थान-पंजाब सीमेवर छापा टाकून त्याला अटक केली.
पूर्वी कंपनीत मजूर म्हणून काम : चौकशीत आरोपी पूर्वी उरुळी देवाची परिसरातील एका कंपनीत मजूर म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक माहितीचा फायदा घेत त्याने स्टील व्यावसायिकाच्या गोदामाची रेकी करून टोळीला माहिती पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे.
त्यानंतर खंडणी मागणी आणि गोळीबाराचा कट रचण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. आरोपीचा पलायन मार्ग सीसीटीव्हीतून ट्रॅक : उरुळी देवाची गोळीबारानंतर दुचाकीने ऊड्री, ऑटो रिक्षाने नाशिक फाटा. नाशिक फाटा येथून कॅबने नाशिक येथे. तेथून खासगी बसने सुरत. नंतर राजस्थान. पोलिसांनी राजस्थान येथील पंजाब सीमेवरून पकडले.