

बारामती: पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा वॉटर फिल्टरला विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यूच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी कृषी पदवीधर संघटनेने केली आहे. अन्यथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर) कार्यालयावर तीव आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय 23, रा. डोंगरगण, ता. आष्टी, जि. बीड) हा पुणे कृषी महाविद्यालयात ‘ॲग््रािकल्चर बिझनेस मॅनेजमेंट’ प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. दि. 14 मार्च रोजी रात्री मेसमधील वॉटर फिल्टरचा वापर करताना त्याला विजेचा तीव धक्का बसला.
गेल्या दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक महेश कडूस पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष सूरज खोमणे यांनी बारामती येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
संघटनेने शासनाकडे चव्हाण कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली असून, वस्तीगृह अधीक्षक, मेसचालक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यातील सर्व कृषी महाविद्यालयांचे फायर व इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट तातडीने करून ते नियमित दरमहा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या वेळी सूरज खोमणे यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करत, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देत पीडित कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले.