पुणे : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभागरचनेवर गुरुवारी (दि. 12) राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले. प्रारूप प्रभागरचनेवर आलेल्या हरकती व सूचनांतील 40 टक्के शिफारशी स्वीकारून ही रचना अंतिम झाली असून, त्यात माननीयांचे प्रभाग सुरक्षित झाल्याची चर्चा आहे.
राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवडसह 14 महापालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पुणे महापालिकेची प्रभागरचना अंतिम करण्याची गुरुवारी अखेरची मुदत होती. त्यानुसार आयोगाने पुणे पालिकेच्या 58 प्रभागांच्या रचनेवर अंतिम शिक्कामोर्तब केले.
ही प्रभागरचना अंतिम करताना हरकती व सूचनांवर यशदाच्या महासंचालकांनी सुनावणी घेऊन ज्या काही प्रभागांच्या रचना बदलाच्या शिफारशी केल्या होत्या, त्यामधील जवळपास 40 टक्के शिफारशी आयोगाने स्वीकारल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यात प्रामुख्याने सर्वच पक्षांतील दिग्गज पदाधिकार्यांचे प्रभाग सुरक्षित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, नक्की कोणाला ही प्रभागरचना अधिक अनुकूल झाली आणि कोणाला नक्की धक्का बसला, यासंबंधीचे चित्र अंतिम प्रभागरचना 17 मे रोजी जाहीर झाल्यावर स्पष्ट होऊ शकणार आहे. आता निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाल्याने ही प्रभागरचना जाहीर करण्याची कार्यवाही महापालिकेकडून होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार या आठवड्यात प्रभागरचना अंतिम होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या काही माननीयांनी दोन दिवस मुंबईतच तळ ठोकल्याचे सांगण्यात येत आहे. स्वत:चे प्रभाग अनुकूल व्हावेत, यासाठी या मंडळींनी फिल्डिंग लावली होती. यामध्ये पालिकेत महत्त्वाची पदे भूषविलेल्या दोन्ही पक्षांतील पदाधिकार्यांचा समावेश होता.