पुणे : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी महापालिकेत येत आहेत. पंडित नेहरू यांनीही तब्बल दोनवेळा पुणे महापालिकेला भेट देऊन महाराष्ट्रीय पद्धतीचे भोजन घेतले होते. त्यामुळे नेहरूंनंतर महापालिकेत येणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत. महापालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने मोदी थेट महापालिकेत येणार असल्याने आता तब्बल 62 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महापालिकेत दोनवेळा उपस्थित राहिलेल्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
विश्रामबागवाड्यातून महापालिकेचा कारभार नवीन वास्तूत म्हणजेच आत्ताच्या इमारतीत सुरू झाला. त्यानंतर पंडित नेहरू महापालिकेत आले होते. 5 जून 1960 रोजी महापालिकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला होता. त्या वेळेस नेहरूंसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सर्व सभासदांना महापालिकेच्या इमारतीत भोजन ठेवण्यात आले होते. त्या वेळचे तत्कालीन महापौर अॅड. वा. ब. गोगटे यांनी नेहरूंच्या पालिकाभेटीची आठवण डॉ. मा. प. मंगुडकर यांच्या 'आठवणीतील पुणे' या ग्रंथात दिली, ती पुढीलप्रमाणे…
'पंतप्रधान पंडित नेहरू ठरल्या वेळी म्हणजे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी महापालिकेत आले. जाहीर वेळ आठचीच होती. डॉ. काटजूंसमवेत येऊन ते प्रवेशद्वाराच्या चौकात घातलेल्या बैठकीवर बसले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मला म्हणाले, 'गोगटे, पंडितजींना जेवायला घेऊन जाऊया!' मी म्हणालो, 'आमची सर्व तयारी आहे. पण, तुमच्यापैकी कार्यकारिणीचा एकही सभासद आलेला नाही. सुमारे दोनशे पानांची व्यवस्था केली आहे.' You are going before empty tables !' मग आता कसे करावयाचे?
मी म्हणालो, तुम्हीच विचारा. मी पंडितजींच्या जवळ गेलो व त्यांना म्हटले, "Are you tired, Sir ?' 'छे. छे !' "Would you mind seeing this nice building which is one of the finest in India!' यशवंतराव मध्येच म्हणाले, Gogate you should not say so.'
मी म्हटले That is the observation of the Calcutta Mayor who visited this building recently.' यावर पं. नेहरू म्हणाले, 'चलो, काटजू बिल्डिंग देखेंगे।'
सुमारे 25 मिनिटे पं. नेहरूंनी ही शानदार वास्तू पाहिली. अनेक प्रश्न विचारले, महापौर कोठे बसतात? सभेचे कामकाज कसे चालवितात? ते स्वत: सभासद बसतात त्या आसनावर बसले. सभासदांची बैठक पाहून ते विनोदाने म्हणाले, 'गोगटे, या बैठकीत थोड्या वेळाने झोप येईल अशी ही बैठक आहे.' मी म्हणलो, आम्हीही फार वेळ सभा चालवीत नाही. तास, दीड तास फार तर! ' मग हशा पिकला! येताना मी त्यांना लिफ्टजवळ नेले. Lift not for going down.' ही पाटी त्यांनी वाचली व तडक जिन्याच्या पायर्या उतरून ते खाली आले. तोपर्यंत यशवंतरावांनी गाड्या पाठवून मंडळींना भोजनास आणले होते. भोजन अगदी महाराष्ट्रीय पद्धतीचे होते. पंडितजी आवडीने जेवले. "Pandit Nehru taking a Maharashtrian meal' या मथळ्याखाली जो फोटो प्रसिद्ध झाला आहे तो या प्रसंगाचा आहे. भोजनोत्तर आम्ही त्यांना निरोप दिला व ते गाडीत बसून निघून गेले.
12 जुलै 1961 ला पानशेत धरण फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतरही म्हणजेच अवघ्या वर्षभरात पंडित नेहरूंनी पुणे महापालिकेला भेट दिली. त्या वेळेस रोहिदास किराड महापौर होते. त्या वेळच्या छायाचित्रांच्या स्वरूपातील काही आठवणी किराड यांचे पुतणे माजी नगरसेवक वीरेंद्र किराड यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.