

पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी एक अशी सौर थर्मल ऊर्जा साठवणूक प्रणाली विकसित केली आहे, जी 'फेज चेंज मटेरियल' आधारित थर्मल बॅटरीमध्ये सौर उष्णता साठवून सूर्यास्तानंतरही गरम पाणी उपलब्ध करून देते. सौरऊर्जेशी संबंधित सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक असलेल्या 'अनियमित उपलब्धते'वर हे तंत्रज्ञान उपाय करते आणि पाणी गरम करण्यासाठी वीज आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता ठेवते.
एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. अनिता नेने आणि डॉ. रोहित घाडगे यांनी विकसित केलेली ही प्रणाली 'शेफलर सोलर कॉन्सेन्ट्रेटर'ला पॅराफिन वॅक्स असलेल्या थर्मल स्टोरेज कॅप्सूलशी जोडते. हे एक 'फेज चेंज मटेरियल' असून, ते मोठ्या प्रमाणात उष्णता साठवून ठेवण्यास आणि गरजेनुसार मुक्त करण्यास सक्षम आहे.
इलेक्ट्रोकेमिकल बॅटरीवर अवलंबून असलेल्या पारंपरिक ऊर्जा साठवणूक प्रणालींच्या विपरीत, हे प्रस्तावित तंत्रज्ञान ऊर्जा थेट उष्णतेच्या स्वरूपात साठवते. उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आणि उर्जेचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी या प्रणालीमध्ये वेगळी करता येणारी पीसीएम ट्यूब, वॉटर-जॅकेट हीट ट्रान्सफर मेकॅनिझम आणि पॉलीयुरेथेन इन्सुलेशनचा वापर केला आहे. संशोधकांच्या मते, प्रयोगशाळेतील चाचणीदरम्यान हे तंत्रज्ञान १८ मिनिटांत पूर्णपणे थर्मल चार्ज झाले आणि ३२ मिनिटांत पूर्णपणे डिस्चार्ज झाले.
सौरऊर्जा मिळणे बंद झाल्यानंतरही ही प्रणाली गरम पाणीपुरवठा करत राहिली, ज्यामुळे दिवसाच्या प्रकाशाव्यतिरिक्त ही थर्मल ऊर्जा देण्याची तिची क्षमता सिद्ध झाली. सौरऊर्जेची एक प्रमुख मर्यादा म्हणजे ती फक्त सूर्यप्रकाश असतानाच उपलब्ध असते. आमचे उद्दिष्ट एक साधे, किफायतशीर आणि शाश्वत थर्मल स्टोरेज सोल्युशन विकसित करणे होते, जे सौरऊर्जा साठवू शकेल आणि गरजेनुसार उपलब्ध करून देईल, असे डॉ. अनिता नेने यांनी सांगितले.
शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना हातभार लागेल
डॉ. रोहित घाडगे म्हणाले, "एकूण ऊर्जा वापरात थर्मल ऊर्जेचा मोठा वाटा आहे. सौर उष्णतेची कार्यक्षम साठवणूक सक्षम करणारी तंत्रज्ञाने पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास, ऊर्जा सुरक्षा सुधारण्यास आणि स्वच्छ व शाश्वत ऊर्जा प्रणालीकडे जाण्यास मदत करू शकतात. हे तंत्रज्ञान सध्या 'टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल' वर असून, वास्तविक वातावरणात प्रायोगिक वापरासाठी तयार केले जात आहे. यामुळे दरवर्षी सुमारे २.५ ते ३ टन कार्बन उत्सर्जन कमी होऊन भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना हातभार लागेल.