

मंचर: कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसतानाच साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या लोखंडी बराकीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. लोखंडाच्या दरवाढीमुळे बराकी उभारणीचा खर्च प्रचंड वाढला असून, शेतकऱ्यांचे गणित कोलमडत आहे.
पूर्वी लोखंडाचे दर 55 ते 58 रुपये किलो होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमती वाढून सध्या हे दर 60 ते 65 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे कांदा साठवण्यासाठी लागणाऱ्या बराकीचा खर्च झपाट्याने वाढला आहे. साधारण 81 फूट लांबी व 5 फूट रुंदीची, सिमेंट पत्र्याचे आच्छादन असलेल्या बराकी उभारण्यासाठी सध्या सुमारे अडीच लाख रुपये खर्च येत आहे.
काठापूर येथील शेतकरी बबन बाळा करंडे यांनी वाढत्या खर्चामुळे अडचणी वाढल्याचे सांगितले. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसताना साठवणूक खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच डळमळीत होत आहे.कृषी विभागाकडून 25 टन क्षमतेच्या कांदा बराकीसाठी 1 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
मात्र लोखंड, सिमेंट पत्रे, सिमेंट तसेच वेल्डिंग मजुरी वाढल्याने हे अनुदान अपुरे ठरत असून, त्यात वाढ करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. कांद्याला बाजारात भाव नाही; पण साठवणुकीसाठी बराकी उभारायला लाखो रुपये खर्च येतोय. लोखंड दरवाढीमुळे खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे, असे चांडोलीचे मोहन थोरात यांनी सांगितले.
तर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे लोखंड महागले आहे. त्यामुळे कांदा बराकी तयार करण्याचा खर्च वाढला असून, सरकारने अनुदानात वाढ करावी, अशी मागणी अवसरी खुर्दचे राधेश्याम शिंदे यांनी केली.