

सासवड: पुरंदर तालुक्यातील पिलाणवाडी धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावला आहे. सध्या या तलावात केवळ 17 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. याबाबत गराडे पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी माहिती दिली. एकूण 69.22 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणातील साठा संपुष्टात येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
पिलाणवाडी जलाशयावरून शिवरी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे खळद, एखतपूर-मुंजवडी, वाळुंज, निळुंज आणि साकुर्डे या गावांना पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय जेजुरी येथील 400 केव्ही विद्युत वितरण कंपनीलाही याच धरणातून पाणी दिले जाते. मात्र, साठा घटल्याने या सर्व भागांतील पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे 399 हेक्टर क्षेत्रातील शेतीला रब्बी व खरीप हंगामात पाणी दिले जाते. उचल पाण्याच्या परवान्याची मुदत 28 फेबुवारी रोजी संपल्यानंतरही काही ठिकाणी वीज पंपांच्या साहाय्याने बेकायदा पाणी उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे. या पाणीचोरीमुळे उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त ताण येत असून, गावांच्या पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत.
याबाबत महावितरण कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपड यांनी दिली. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील सर्व धरणे व जलाशयांतील साठा उन्हाळ्यामुळे झपाट्याने घटत असल्याने तहसीलदार विक्रम राजपूत यांनी तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.
उपलब्ध पाणीसाठा पुढील मान्सूनपर्यंत टिकविण्यासाठी तो केवळ पिण्याच्या वापरासाठी राखून ठेवावा तसेच शेती किंवा इतर कारणांसाठी होणारा पाणीवापर तत्काळ थांबवावा, असे आदेश देण्यात आले आहेत.प्रशासनाच्या या सूचनांनंतरही पाणीचोरी थांबली नाही, तर आगामी काळात शिवरी परिसरातील पाणीटंचाई अधिक तीव होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थापनाबाबत कठोर अंमलबजावणीसह सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याची गरज आहे.