पुणे : पुढारी वृत्तसेवा
शैक्षणिक फी परत मिळवून देतो आणि कर्ज प्रकरण करून देण्याच्या बहाण्याने विद्यार्थी, महिलांकडून वेळोवेळी पैसे घेऊन दिलेल्या कोणत्याही आश्वासनाची पुर्तता न करता तब्बल 20 लाख 68 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी तिरूपती कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक विकास रघुनाथ बांदल आणि कॅशीअर विलास वामन पाटील यांच्यावर सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र हरिश्चंद्र जाधव (49, रा. योगायोग सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2021 दरम्यान कात्रज बायपास येथील ओमकार नंदन बिल्डिंगमधील कार्यालयात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपींनी फिर्यादीसह इतरांना सरकारकडून शैक्षणिक फीचे पैसे परत मिळून देतो, असे सांगून जाधव यांच्या मार्फतीने 31 विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले. महिला नम्रता यांच्याकडून होमलोन अकाउंट ओपनींगसाठी 2 लाख 68 हजार रूपये घेतले. बिबवेवाडी येथील बेटी आश केंद्र संस्थेमार्फत 159 महिला व पुरूषाकडून भरलेली शैक्षणिक फी परत मिळवून देतो म्हणून प्रत्येकी सहा हजार घेतले. तसेच गरजू गरीब महिलांना व्यावसायासाठी कर्ज मिळून देतो म्हणून 2 लाख 62 हजार घेतले. अशा विविध योजना सांगून आरोपींनी तब्बल 20 लाख 68 हजारांना गंडा घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.