

पुणे: बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण घटत असले, तरी आव्हान कायम आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2025-26 या वर्षात राज्यात 12,792 बालमृत्यू नोंदविले गेले. दररोज सरासरी 35 मुलांचा मृत्यू होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी ही संख्या 45 इतकी नोंदवली जात होती.
आरोग्यसेवा विभागाचे संयुक्त संचालक डॉ. संदीप सांगळे म्हणाले, ’गेल्या काही वर्षांत बालमृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. ती आणखी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक बालमृत्यूचे परीक्षण करण्यासाठी विविध समित्या कार्यरत आहेत.
महिला व बालविकास विभागासोबत समन्वय साधून महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाते; कारण मुलांचे आरोग्य हे मातांच्या आरोग्यावर अवलंबून असते. लसीकरण पथकेही तळागाळात काम करून एकही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, याची काळजी घेत आहेत.’
बालमृत्यूची कारणे
अकाली जन्म, जन्मत: कमी वजन, जन्मावेळी श्वास न लागणे (बर्थ ॲस्फिक्सिया), श्वसनावरील ताण, न्यूमोनिया, सेप्सिस, जन्मजात विकृती आणि आकस्मिक मृत्यू ही बालमृत्यूंची प्रमुख कारणे आहेत.
मागील पाच वर्षांतील महाराष्ट्रातील बालमृत्यू (0-5 वर्षे)
वर्ष : एकूण बालमृत्यू
2021-22: 16,748
2022-23: 17,150
2023-24: 13,810
2024-25: 13,728
2025-26: 12,792