

प्रसाद जगताप
पुणे: नुकत्याच उन्हाळी सुट्ट्या महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या अन् आता सुरुवात झाली, ती उन्हाळी पर्यटनाला... एकीकडे अमेरिका-इराण युद्धाचे सावट असतानाही ते झुगारून पुणेकर पर्यटक कुटुंबीयांसमवेत वाढत्या उन्हामुळे परदेशांतील थंड हवेच्या ठिकाणी झेपावत आहेत. परिणामी, ट्रॅव्हल्स कंपन्यांकडील बुकिंग फुल्ल व्हायला सुरुवात झाली आहे. थंड हवेची ठिकाणे, सागरी बीच आणि बर्फाळ प्रदेशाकडे त्यांचा सर्वाधिक ओढा असल्याचे चित्र दिसत आहे.
सरकारी तथा खासगी रिसॉर्टही सध्या फुल्ल झाली असून, उन्हाळी पर्यटनामुळे देश-विदेशांतील आलिशान हॉटेल्सला मोठी गर्दी होत आहे. शहर, राज्य, देशातील आणि परदेशातील गारव्याचा (थंड हवा) आभास देणाऱ्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांना पुणेकर पर्यटक आवर्जून भेट देण्याचे नियोजन करत आहेत, तर काहीजण तर थंड हवेच्या ठिकाणी पोहोचल्याचेसुद्धा समोर आले आहे.
परदेशात करा पर्यटन
बँकॉक, सिंगापूर, थायलंड, जपान, व्हिएतनाम, न्यूझीलंड, मालदीव, साऊथ अमेरिका, युरोप, स्वित्झरलँड, इटली, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, केनिया, टांझानिया, बाकु, जॉर्जिया, फुकेत, भूतान, श्रीलंका येथेही जाण्यास पर्यटक पसंती देत असल्याचे समोर येत आहे.
देशांतर्गत पर्यटन....
राजस्थानमधील जयपूर, उत्तर प्रदेशातील लखनऊ, वाराणसी, बंगालमधील कोलकाता, गोव्यातील मोपा, कर्नाटकातील बंगळुरू, दिल्ली, पंजाब हरीयाणातील चंदिगढ, अमृतसर, तामिळनाडूमधील चेन्नई, मध्य प्रदेशातील इंदोर, आसाममधील गुवाहटी, तेलंगणामधील हैदराबाद, केरळामधील कोचिन, गुजरामधील अहमदाबाद याशिवाय हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, लेह लडाख यांसारख्या बर्फाळ भागात जाण्याला पर्यटक पसंती देत आहेत.
राज्यातील पर्यटनस्थळे
महाबळेश्वर, माथेरान, पंचवटी (नाशिक), र्त्यंबकेश्वर, शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक, भीमाशंकर, ज्योतिबा, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, रत्नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, चिपळूण, विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली, लोणावळा, खंडाळा, चिखलदरा, पाचगणी, भंडारदरा.
उन्हाळी सुट्यांमुळे भरपूर पर्यटक आता घराबाहेर पडले आहेत. बजेटनुसार जवळदूरचे स्थळांवर पर्यटनवारी ठरवली जात आहे. उन्हाळी सीझनमध्येच विमान कंपन्या तिकिटांचे दर वाढवतात. या तिकीट दर वाढीवर कोणाचेही अंकुश नाही. सीझनमध्ये होणारी तिकीट दरवाढ थांबवण्यासाठी त्यांच्यावर शासनाचा अंकुश असायला हवा. सीझन कोणताही असो, सर्वसामान्यांना परवडतील असे तिकीट दर असणे आवश्यक आहे. तिकिटांचे दर अवाच्या सव्वा केल्यामुळे याचा पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे.
नीलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन (टाप), पुणे