

बारामती: बारामती-पुरंदर तालुक्याच्या काही भागावरील ‘दुष्काळी’ हा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी कऱ्हा आणि निरा या नद्या जोडण्याचे स्वप्न दिवंगत अजितदादा पवार यांनी पाहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 6) राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या प्रकल्पाची घोषणा केल्याने आता हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास जाईल, अशी आशा या भागातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे. अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडू नयेत, यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच अर्थसंकल्पात ही घोषणा केली गेली.
अजितदादा यांच्या स्वप्नातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. पवार यांनी त्यांच्या हयातीत अनेकदा ही योजना राबवत बारामतीच्या दुष्काळी भागाचा जिरायती हा शिक्काच कायमचा पुसून टाकतो, अशी घोषणा केली होती. यंदाचा अर्थसंकल्प सादर करणे पवार यांच्या नशिबात नव्हते, परंतु त्यांच्या पश्चात मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली असून, आता निधीची प्रतीक्षा आहे.
बारामती तालुक्याच्या दुष्काळी भागाचा जिरायती हा शिक्का पुसून टाकण्याचा ध्यास अजितदादांनी घेतला होता. त्यांच्या अधिपत्याखालीच योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. 1024 कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याद्वारे 45 हजार एकरांतील शेतीला पाणी देण्याचे नियोजन होते. पावसाळ्यात निरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते, ते उचलून कऱ्हा नदीच्या लाभक्षेत्रात आणण्याचे नियोजन करण्यात आले होते.
या प्रकल्पासाठी 2.30 मीटर व्यासाची जलवाहिनी करण्यात येणार असून, तिची लांबी 17 कि.मी. एव्हढा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 23286 व दुसऱ्या टप्प्यात 14995 अश्वशक्तीचे दोन पंप बसविले जातील. या योजनेमध्ये निरा डावा कालव्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेरील 33 गावांचा समावेश करण्यात आला आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करत दोन टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तालुक्यातील जनाई-शिरसाई उपसा योजना थकीत वीजबिलामुळे अडचणीत आली होती. तसे या योजनेचे होऊ नये, यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पंप बसविले जाणार आहेत, जेणेकरून वीजबिलाचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार नाही.
जनाई-शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे बारामती तालुक्याचा बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. परंतु राहिलेल्या मोरगाव, बाबुर्डी, शेरेवाडी, काऱ्हाटी, जळगाव कडेपठार, अंजनगाव या भागांसह चौधरवाडी, वाकी गावापासून ढाकाळे, भिलारवाडीपर्यंतची गावे या प्रकल्पांतर्गत ओलिताखाली येणार आहेत.
शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार
तेलंगणात अशा प्रकारे नदीजोड प्रकल्प राबविले गेले आहेत. दरवर्षी वीर धरणातून निरा नदीद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. ते जिरायती भागात आणून शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणारी ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखाने दिवसेंदिवस आपली गाळपक्षमता वाढवत आहेत. भविष्यात उसाचा प्रश्न त्यातून निर्माण होणार आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव, सोमेश्वर यांनाही भविष्यात ऊस कमी पडू शकतो. जिरायती भागाला पाणी मिळाल्यास या भागात ऊस क्षेत्र वाढून त्याद्वारे कारखान्यांना पुरेसा ऊसही उपलब्ध होऊ शकेल.